आ.बच्चू कडू यांच्या उपोषणाला किसान सभेचा पाठींबा
कर्जमाफी करिता किसान सभेचे तीव्र निदर्शने
आ.बच्चू कडू यांच्या उपोषणाला किसान सभेचा पाठींबा
माजलगाव : प्रतिनिधी
अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असताना बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून या खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात हाल केले असून खरिपाची पेरणी कशी करावी या विदारक मानसिकतेत बोगस व महागडी खते, बी-बियाणे याचा खर्च कसा करावा या चिंतेने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत तातडीने बळीराजाला मदत करावी यासाठी बीड जिल्हा किसान सभेने गुरुवार (दि 12 ) रोजी माजलगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आ.बच्चु कडू याच्या उपोषणाला पाठींबा देत सरकारचा निषेध केला.
सरकारी धोरणांमुळे शेतकरी कायम अडचणीत आलेला असून तो कर्जबाजारी झालेला आहे. या कर्जाच्या विळख्यातून त्याला बाहेर काढण्याचे आश्वासन राज्य सरकार मध्ये बसलेल्या सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. मात्र निवडून येताच 'आम्ही असे बोललोच नाही', 'बोललो असलो तरी आम्ही मुदत दिलेली नाही' अशी सारवासारव सुरू केली आहे. बीड जिल्हा किसान सभेने वेळोवेळी कर्जमाफी, पिकविमा, हमीभाव, गायरानजमीन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंबंधी प्रश्न लावून धरला. खरिपाच्या तोंडावर अवकाळी पावसाने केलेले नुकसान, सत्ताधारी मंडळींचे बळीराजा प्रति असलेली आस्था या सर्वच चीड आणणाऱ्या बाबीबर प्रहार संघटनेचे शबच्चू कडू यांनी या व इतर काही मुद्याला घेऊन उपोषण सुरु केले आहे. त्या उपोषणास अखिल भारतीय किसान सभेचा पूर्ण पाठिंबा आहे.राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी निवडणूक वेळी दिलेले आपलं वचन पाळून बच्चू कडू यांना उपोषणापासून परावृत्त करावे. असे झाले नाही बीड जिल्हा किसान सभा या प्रश्नांना घेवून आपल्या पूर्ण ताकतीनिशी मोठे आंदोलन छडेल असा इशारा यावेळी किसान सभेने दिला.
या निदर्शने प्रसंगी किसान सभेचे कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. दत्ता डाके,कॉ.कृष्णा सोळंके, कॉ.सुदाम शिंदे, कॉ. सुदामदादा देशमुख, कॉ. सुहास झोडगे, कॉ.शिवाजी कुरे, कॉ.सुभाष डाके, कॉ.अशोक डाके, कॉ.अशोक राठोड, कॉ.बंडू गरड, कॉ.चंद्रकांत घाटे, कॉ.फारुख शेख आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा