अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदते !
"वैद्यनाथ" मधील योगदिनी डॉ. नयनकुमार आचार्य यांचे विचार
परळी वैजनाथ- (दि.२१)
सद्य परिस्थितीत वाढत्या शारीरिक, मानसिक विकारांना दूर करण्यासाठी "योग" हा मौलिक उपाय असून अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदू शकते, असे प्रतिपादन योग अभ्यासक डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले.
येथील वैद्यनाथ महाविद्यालयात काल (२१) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित योगासन, प्राणायाम व ध्यान शिबिरात ते प्रमुख प्रशिक्षक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ .जे.व्ही. जगतकर यांनी केले.
या शिबिरात श्री आचार्य यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम, विविध आसने , भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम व ध्यानमुद्रा आदींचे प्रशिक्षण दिले. तसेच योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगांचे महत्त्व प्रतिपादन केले. यावर्षीच्या "एक पृथ्वी - एक आरोग्यासाठी योग" या संकल्पनेनुसार समग्र भूतळावरील प्रत्येक देशात निवास करणाऱ्या प्रत्येक मानवासाठी "योग" हा खुला असून योगाच्या आचरणाने सर्व प्रकारचे चिंता,नैराश्य, दुःख, वैरभावना लयास जातात. म्हणूनच विश्वकल्याणासाठी अष्टांग योग हे शाश्वत सुखाचे मुख्य द्वार आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी या शिबिरात उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्रा. हरीश मुंडे, प्रा.डा. पी. एल. कराड, प्रा.डा. माधव रोडे, कॅप्टन प्रा. जी.एस. चव्हाण, साई अकॅडमीचे संचालक प्रा.रमेश पवार यांच्यासह जवळपास अडीचशे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा.जी.एस.चव्हाण यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा