स्वच्छतेकडे गंभीर दुर्लक्ष- नागरीकांच्या आरोग्याला धोका!
परळी शहरात व्हायरल आजारांचा प्रकोप; सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची वाढती गर्दी
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
परळी शहरात सध्या व्हायरल आजारांचा प्रकोप वाढत असून, स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.जुलाब, उलटी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, आणि थकवा अशी लक्षणे घेऊन अनेक नागरिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात सुमारे ५०० हून अधिक रुग्णांनी विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये संसर्गजन्य आजारासंदर्भात उपचार घेतले आहेत. काही रुग्णांना डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या तापाच्या प्रकारांचीही लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.स्थानिक रुग्णालयांच्या अनेक डाॅक्टरांनी सांगितले की, “पावसाळ्यापूर्वी हवामानात होणाऱ्या बदलामुळे अशा आजारांमध्ये वाढ होते. सध्या तापाचे प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.”
शहरातील अनेक औषध दुकानांमध्ये जुलाब, उलटी, ताप व सर्दीच्या औषधांची मागणी वाढली आहे. तसेच, विविध आरोग्य केंद्रांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने
उकळलेले व स्वच्छ पाणी प्या, बाहेरचे व उघड्यावरचे अन्न खाणे टाळा, वेळोवेळी हात धुवा
जुलाब, उलटी, ताप, अंगदुखी, अथवा अन्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असे नागरिकांना आवाहन केले.
●●●●●●●●●
नगरपालिकेची फॉगिंग व स्वच्छता मोहिमा कधी?
परळी शहरात जागोजागी अस्वच्छता दिसून येत असून नाली, गटार तुंबलेल्या अवस्थेत आहेत.अनेक भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जल वाहिनीचे वॉल लिकेज आहेत. या सर्व कारणांमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली असून याचा परीणाम डास मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. नगर परिषदेने लवकर स्वच्छता मोहीम राबवून डास निर्मूलन करण्यासाठी फवारणी करावी अशी मागणी परळीकर करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा