आपत्तीच्या परिस्थितीत प्रशासन किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करा - धनंजय मुंडे यांचे आवाहन
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, नागरिकांनी सतर्क राहण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन
मी प्रशासनाशी संपर्कात, आपत्तीच्या परिस्थितीत प्रशासन किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करा - धनंजय मुंडे यांचे आवाहन
प्रशासन अलर्ट मोडवर, नद्या - नाल्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, पुलावरून पाणी, वाहतूक बंद
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी - अंबाजोगाई तालुक्यांसह बीड जिल्ह्यात सर्वदूर सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून, मागील २४ तासात अनेक महसुली मंडळांमध्ये पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली आहे व त्यापुढेही सतत पाऊस सुरूच आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे उघडल्याने बीड जिल्ह्यात प्रवाह असलेल्या अनेक नद्यांना पूर आला असून, लहान - मोठे सर्वच प्रकल्प भरून नद्या दुथड्या भरून वाहत आहेत, अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असून, बरेच रस्ते बंद देखील करण्यात आले आहेत. याच पार्शवभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
धनंजय मुंडे यांनी आपण सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात असून, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे म्हटले आहे. वीज प्रवाह, तारा, खांब आदी ठिकाणांपासून दूर राहावे, वाहत्या पाण्यात वाहने घालू नयेत किंवा पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यातून पादचारी किंवा वाहने घालू नयेत, धोकादायक किंवा पडझड झालेल्या घरापासून सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
दरम्यान सततच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नद्यांना पूर आले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा आपत्ती परिस्थितीत कोणत्याही मदतीसाठी माझ्या कार्यालयास संपर्क साधावा, असेही आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा