उष्माघातापासुन नागरिकांनी काळजी घ्यावी
परळीत उष्माघाताचा बळी! भाजीपाल विक्रेत्यावर काळाचा घाला; कुटुंब उघड्यावर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असुन उन्हाच्या तीव्रतेने जीवाची लाही लाही होत आहे. वाढलेले तापमान लक्षात घेता उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना उन्हात काम केल्याशिवाय गत्यंतरच नाही. यातूनच परळीच्या आठवडी बाजारातील एका भाजीविक्रेत्यावर काळाने घाला घातला असुन उष्माघाताने त्याचा बळी गेला आहे.
परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील महादेव संभाजी गुट्टे वय 54 वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला उत्पादित करून आठवडी बाजारात हातावर भाजीपाला विकतात. आजच्या आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी हे शेतकरी बसले होते. सकाळपासूनच उन्हाचा कडाका होता. परळीत दुपारच्यावेळी तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअस इतका वाढलेला होता. उन्हाची प्रचंड तीव्रता वाढलेली असल्याने भरदुपारी उष्माघाताचा फटका या भाजीविक्रेत्याला बसला आणि भर बाजारातच उष्माघाताने भोवळ येऊन तो पडला. आजूबाजूच्या लोकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय परळी येथे आणले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा तडकाफडकी मृत्यू झाला. परळी तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा