ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती
आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत सांघिक विजेतेपद सिल्लोडच्या इंद्रराज महाविद्यालयास, तर उपविजेतेपद कन्नडच्या संत तुकाराम महाविद्यालयास !
परळी वैजनाथ,(दि.३- ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.३) आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री (१०कि.मी. धावणे) क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. यात सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयाच्या संघाने सांघिक विजेतेपद पटकावले, तर कन्नडच्या संत तुकाराम महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले.
शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन लगतच्या महाविद्यालयाच्या भव्य धावपट्टी क्रीडा मैदानावर सकाळी पार पडलेल्या उद्घाटन समारंभात जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इतके यांनी विद्यापीठ ध्वज फडकावून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे , नूतन नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, प्राचार्य डॉ. जे.व्ही. जगतकर, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉ. पी. एल. कराड, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा प्रतिनिधी डॉ. सुरेंद्र मोदी , डॉ. अभिजीत सिंग दिख्खत, विविध तज्ज्ञ पंच, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे व नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध ठिकाणच्या जवळपास ५० महाविद्यालयांच्या ८५ मुलांनी तर २५ मुलींनी परळी ते वसंतनगर कॉर्नरपर्यंत जाणे - येणे १० किलोमीटरचे अंतर एका तासात पूर्ण केले.
स्पर्धेतील सांघिक विजेते पटकावलेल्या सिल्लोडच्या इंद्रराज महाविद्यालयाच्या संघास व उपविजेतेपद पटकावलेल्या कन्नडच्या संत तुकाराम महाविद्यालयाच्या संघास जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके यांच्या हस्ते विद्यापीठाचा चषक प्रदान करून गौरविण्यात आले.या स्पर्धेत मुलींच्या समूहातून कु. गायत्री गायकवाड, कु.साक्षी भांडारकर, कु. स्नेहल शिंदे, कु.सुहानी खोब्रागडे, कु.दीक्षा वाघ ,कु.कावेरी वरपे यांना तर मुलांच्या समूहातून अतुल जाधव, नामदेव भोसले, विराज जाधवर, अंगद पाणीटे, विनय ढोबळ, रामेश्वर भुसे या मुलांना व्यक्तिगत पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
श्री इटके यांनी धावण्याच्या शर्यत खेळातून शारीरिक प्रगतीबरोबरच आत्मविश्वास वाढून जीवनात उंचावर झेप घेण्याची भावना वृद्धिंगत होते. चारित्र्यसंपन्नता विकसित होते आणि मन व बुद्धीच्या विकासाने आत्मिक सामर्थ्य वाढते, असे विचार मांडले. अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ जे.व्ही. जगतकर यांनी शारीरिक व मानसिक विकासात खेळाचे महत्व वाढीला लागते, असे उद्गार काढले .
विद्यापीठ क्रीडा प्रतिनिधी डॉ. सुरेंद्र मोदी व डॉ. अभिजीतसिंग दिख्खत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंच म्हणून विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडातज्ज्ञ सर्वश्री डॉ. युसूफ पठाण, डॉ. फेरोज पटेल, डॉ. सानप, डॉ. तत्तापुरे, डॉ. रणमाळ, डॉ. टेकाळे, डॉ. सुनील गायसमुद्रे, डॉ. दिग्रसकर, डॉ. सुहास यादव, डॉ. सीमा मुंडे,डॉ. अनिता पारगांवकर, डॉ. योगेश निकम, डॉ. राम जाधव, डॉ. युवराज आंधळे, डॉ. माधव इंगळे, डॉ. योगेश थोरवे आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग संचालक डॉ. पी. एल. कराड यांनी केले तर आभार विभागप्रमुख डॉ .श्री विजय बेंडसुरे यांनी मानले.
कार्यक्रमास साई अकॅडमीचे प्रमुख रमेश चव्हाण, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. हरीश मुंडे, प्रा. विजय मुंडे, प्रा.डा. माधव रोडे, प्रा. कॅप्टन जी. एस. चव्हाण, प्रा.डा.नयनकुमार आचार्य, यांच्यासह क्रीडाप्रेमी शिक्षक, प्राध्यापक व नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा