पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात इ.१०वी वर्गाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-
पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या इ.१०वी वर्गाचा 'शुभेच्छा समारंभ' दि.१७ फेब्रुवारी २०२५ सोमवार रोजी उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयराव विभूते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून १०वी प्रमुख विष्णू तेलंगे उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थी मनोगतात इ.१०वीतील कु.सुप्रिया साळवे,अक्षता थोरात,अक्षता साळुंके,प्रिया वाघमारे,प्रीती सोळंके,निशिगंधा निकम,चि. विश्वजित निकम,सलमान शेख,साजिद शेख,गजानन पांचाळ,प्रणव वाघमारे,ओमकार कल्याणी यांनी विद्यार्थी जीवनातील एक टप्पा पूर्ण केल्याचा आनंद आणि या काळातील विविध क्षणांना पारखं झालो याचे दुःख व्यक्त केले.तसेच कु.वैष्णवी गुळवे हिने सादर केलेल्या 'का कळेना अशी हरवली पाखरे' या गीताने सर्वांना याप्रसंगी अंतर्मुख केले.
शिक्षक मनोगतात ज्ञानेश मातेकर यांनी आपल्या मनातील विद्यार्थ्यांच्या हृदय आठवणींना उजाळा दिला.
प्रमुख मार्गदर्शक तेलंगे यांनी
१०वी नंतर पुढे काय? याबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना म्हणाले की,नव्या युगात झेप घेताना प्रत्येकाला 'स्व' ची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे.भविष्याचा वेध घेताना ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये ध्यास,नियोजन,योग, स्वाध्याय इ.मूल्यांची रुजवणूक करून घेणे आवश्यक आहे असे विचार मांडून त्यांनी सर्वांना पुढील काळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच१०वी वर्गाचा निकाल उंचावण्यासाठी शाळेच्या वतीने करण्यात आलेले विविध प्रयत्न याचा आढावा घेतला.
अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करताना संजयराव विभूते यांनी शाळेने दिलेल्या संस्काररूपी शिदोरीच्या आधारे विद्यार्थ्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी.तसेच पुढील परीक्षेला सर्वांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे असे आवाहन केले.
सर्व १०वीच्या विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या निधीतून शाळेप्रती ऋण व्यक्त करत विद्यालयास शालेय कामकाजासाठी मोठा टेबल भेट दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश मातेकर,वैयक्तिक पद्य कु.नेहा वाघमारे ,प्रास्ताविक व परिचय नितीन चौधरी तर आभार प्रदर्शन राकेश मोरे यांनी केले.
कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा