गणेशपार डीपीच्या देखभालीकडे महावितरण चे दुर्लक्ष; परळीत 'आम आदमी पार्टी'चा आंदोलनाचा इशारा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरातील गणेशपार भागातील विद्युत डीपीच्या देखभालीसाठी वारंवार विनंती करूनही महावितरण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत गणेशपार डीपीचे मेंटेनन्स न झाल्यास व्यापारी व नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशपार भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महावितरण कार्यालयाला लेखी अर्ज देऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. थकीत वीजबिल असल्यास तातडीने वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणला ग्राहकांच्या समस्यांचे सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे. "वारंवार वीज गेल्यामुळे होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाची भरपाई महावितरण देणार का?" असा सवाल विजय जोशी यांनी उपस्थित केला आहे. जर तातडीने गणेशपार डीपीचे मेंटेनन्स पूर्ण झाले नाही, तर गणेशपार भागातील सर्व व्यापारी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागाने महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा