'जीवनविद्या मिशन' शाखा परळी च्या वतीने उत्साहात प्रवचन कार्यक्रम
विचारांच्या सामर्थ्यातूनच राष्ट्रहित आणि विश्वशांती शक्य – नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी
माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब -डॉ. सौ. प्रतिमा संखे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
विचारांचे सामर्थ्य मोठे असते. सकारात्मक आणि राष्ट्रहित जपणाऱ्या विचारांतूनच आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. डॉ. सौ. प्रतिमा संखे यांचे मार्गदर्शन परळीकरांसाठी वैचारिक मेजवानी ठरले असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतानाव सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या शिष्या डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन केले.
परळी वैजनाथ येथील आर्यसमाज मंदिरात जीवनविद्या मिशन, मुंबई शाखा परळी वैजनाथ यांच्या वतीने आयोजित 'विचारांचे सामर्थ्य मोठे' या विषयावरील प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. थोर समाज सुधारक सद्गुरू वामनराव पै यांच्या शिष्या आणि २०२२ च्या युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांच्या मातोश्री डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक रमाकांतअप्पा निर्मळे यांनी प्रास्ताविकात या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. डॉ. प्रतिमा संखे यांनी आपल्या प्रवचनातून 'प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची' असा संदेश देत जीवनविद्या मिशनच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला.
यावेळी सविस्तर मार्गदर्शन करताना डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी सांगितले की,माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असते. जर आपले विचार शुद्ध, विधायक आणि राष्ट्रहिताचे असतील, तर आपली प्रत्येक कृती आपोआपच समाज कल्याणाकडे वळते. सद्गुरु वामनराव पै यांनी दिलेला 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा मंत्र केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नसून, तो विश्वशांतीचा मार्ग दाखवणारा आहे. जेव्हा आपण स्वार्थाकडून परार्थाकडे जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचारांचे सामर्थ्य प्रकट होते. त्यामुळे या विचारांचे अनुकरण सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले की, सद्गुरु वामनराव पै यांचे विचार हे जीवनाला देशा देणारे विचार आहेत. जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून परळी शहरात अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने निश्चितच जीवनाची एक दिशा आणि मार्ग सापडणार आहे.आजचा हा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने वैचारिक मेजवानीच ठरला असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला परळी शहरातील नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाकांतअप्पा निर्मळे, त्यांचे मित्र मंडळ व जीवन विद्या मिशन शाखा परळी वैजनाथ यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा