संघर्षाचा वारसा आलेल्या किसान सभेचे सिरसाळ्यात जिल्हा अधिवेशन
डॉ.अजित नवले, उमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
परळी / प्रतिनिधी....
आस्मानी आणि सुलतानी संकटाविरुद्ध दोन हात करणाऱ्या कष्टकरी, ऊसतोड कामगार आणि जिद्दी शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या श्रमाला मोल मिळवून देणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेचे 24 वे जिल्हा अधिवेशन परळी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणी बुधवार दि 15 रोजी संपन्न होणार असून या अधिवेशनास डॉ.अजित नवले, उमेश देशमुख यांच्यासह अनेक लढवय्या शेतकरी नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी सातत्याने सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मातीला संघर्षाचा मोठा वारसा आहे.क्रांतिसिंह नाना पाटील, कॉ.गंगाधरआप्पा बुरांडे, कॉ. बापूसाहेब आण्णा देशमुख, कॉ गुंडा आप्पा जिरगे , कॉ. हमीद हुसेन, कॉ. नानासाहेब पोकळे, कॉ. यशवंत माने, कॉ. निर्मळ, कॉ. सी. एम. शेख, कॉ. नारायण शेप कॉ मा.म.साखरे, कॉ.बाळनाथ शेळके यांसारख्या नेत्यांनी किसान सभेच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांना संघटित करून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले.
तोच संघर्षाचा वारसा आजमितीला बीड जिल्हा किसान सभा पुढे नेत असून आजच्या बिकट परिस्थितीत कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव, ऊस दरवाढ, भूसंपादन प्रक्रिया, शेतकरी विरोधी जागतिक करार या सारख्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर किसान सभा लढत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे २४ वे जिल्हा अधिवेशन परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अर्जुनेश्वर विद्यालय या ठिकाणी बुधवार दि 15 रोजी संपन्न होणार असून या अधिवेशनात शेतीमालाला कायदेशीर हमीभाव मिळावा, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी रोखून सरसकट पीकविमा नुकसान भरपाई द्यावी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखानदारांनी घोषित केल्याप्रमाणे गाळप केलेल्या उसाची थकीत देयके तत्काळ व्याजासह देण्यात यावीत, शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा आणि सौर ऊर्जा प्रकल्पातील तांत्रिक समस्या दूर कराव्यात, कॉर्पोरेट धार्जिणे सक्तीचे भूसंपादन रद्द करावे, शेतकरी विरोधी अमेरिका भारत करार रद्द करावा. वन्य प्राण्यापासून पिकाचे संरक्षण करणे व सामाजिक सलोखा जोपासणे इत्यादी या विषयावर विचार मंथन होऊन मागण्या पारित करण्यात येणार आहेत.
या अधिवेशनास जिल्हयातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आव्हावन बीड जिल्हा किसान सभा अजय बुरांडे मुरलीधर नागरगोजे बळीराम देशमुख भगवान बडे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा