परळीतील तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
खा.बजरंग सोनवणे यांची मागणी, पीडित कुटुंबाची भेट घेऊन व्यक्त केल्या तीव्र भावना
परळी: तौहिद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
येथील युवक तोहीद पठाण याची काही दिवसांपूर्वी झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरासह जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पठाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर, बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी आज पीडित कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि संपूर्ण कुटुंबियांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी आम्ही पठाण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही देत खासदार सोनवणे यांनी या प्रकरणातील दोषींवर अत्यंत कठोर आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी पठाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्या व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे पठाण कुटुंबियांना झालेल्या वेदना पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सोनवणे म्हणाले, तोहीदची हत्या ही केवळ एका तरुणाची हत्या नसून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना आहे. अशा कठीण प्रसंगी पठाण कुटुंबाला धीर देणे हे आपले कर्तव्य आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. या नराधमांना कायद्याचा कठोर हिसका दाखवणे गरजेचे आहे.
परळीत संपाताची लाट, खा.सोनवणेंचा इशारा
परळी आणि परिसरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. खा.सोनवणे यांनीही प्रशासनाला आणि पोलीस विभागाला या प्रकरणात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. गुन्हेगारांना तात्काळ बेड्या ठोकून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा