आरोग्य - सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार - स्वानंद सोनार
जिल्ह्यातील २5 स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठक
‘निरामय बीड अभियान’ वर सविस्तर चर्चा
बीड , दि. ११७ एप्रिल : जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, रुग्णालये व स्वयंसेवी संघटनांनी एकत्रितपणे कार्य केल्यास आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचू शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्यस्तरीय वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद अरुण सोनार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभाग्रहात आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील समन्वयासाठी आयोजित मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मा.जिल्हाधिकारी विवेक जॉनसन , निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , डॉ. अजित विसपुते उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक, युवराज महाजन, संस्था समन्वयक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बीड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कागदे चैतन्य , राहुल चव्हाण व गणेश गिराम जिल्हा समन्वयक आणि जिल्ह्यातील २५ स्वयंसेवी संस्था व प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ.सोनार म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सर्व उपक्रमांना आवश्यक समन्वय व सहकार्य देण्यासाठी कटिबद्ध आहे. गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळवून देताना शासकीय निधीचा अपहार करणारे तथाकथित रुग्णसेवक तसेच अशा गैरप्रकारांना सहाय्य करणारी अथवा खोटी रूग्णप्रकरणे सादर करून शासकीय पैशाचा अपहार करणारी रुग्णालये, योजनेसह संलग्नता प्राप्त करून देण्यासाठी पैसे मागणारे मध्यस्थ या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी कळविले ,सोबतच मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत गेल्या वर्षभरात पुरवलेल्या सेवा, विशेष उपक्रम, व वितरीत निधी या संदर्भात संक्षिप्त आढावा देण्यात आला.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी दरमहा सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन रुग्णालयांनी करावे, त्यात सेवाभावी संस्था नी व्यापक स्वरूपात सहभागी व्हावे, कॅन्सर आरोग्य तपासणीचे प्रमाण वाढवण्यासाठी फिरत्या चिकित्सा पथकांचा वापर वाढवावा, असेही त्यांनी आवाहन केले.
महिलांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण धोरण निश्चित करण्यात आले. महिला सक्षमीकरण, पोषण, आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्य समस्यांचा विचार करून त्यांच्यासाठी शुश्रूषा सेवा, निवारा केंद्रे स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात आला. या घटकांसाठी विशेष आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर सर्व प्रतिनिधींनी एकमत दर्शवले.
जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या आरोग्य विषयक प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच उसतोड महिला , एकल महिला , घरकामगार महिला ई. साठी विशेष प्रकल्प राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.प्रशासन ,रुग्णालये व स्वयंसेवी संस्थांनी मिळुन वाढत्या मानसिक आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
बैठकीदरम्यान ‘निरामय बीड अभियान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सादरीकरण व सविस्तर चर्चा सत्र करण्यात आले. या अभियानांतर्गत सर्वसमावेशक व आजार प्रतिबंधक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर तज्ज्ञांनी मते व्यक्त केली. जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक उंचावण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण आरोग्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
गत काही वर्षापासून कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे , विशेषतः महिलांना होणाऱ्या कॅन्सर च्या प्रमणात खूप वाढ झाली आहे, आणि त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्यवरती पडत आहे.याच्या प्रमाणात घट करायची असेल तर प्राथमिक तपासणी करून लवकरात लवकर त्याचे निदान होणे आवश्यक आहे. यासाठी “ निरामय बीड कृतीदल ” डॉ. स्वानंद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बीड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कागदे चैतन्य, श्री सेवा भावी संस्थेच्या अध्यक्ष ॲड भाग्यश्री ढाकणे, भगवंतकुमार फौंडेशन चे अध्यक्ष ज्योतिबा नन्नवरे, भगवंत पळवडे (श्री ज्ञानेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था), बबनराव माने (जय महाराष्ट्र उसतोड कामगार संघटना ) यांच्यावर या कृतीदलाच्या अंमलबजवणी ची जबाबदारी देण्यात आली.
या बैठकीस श्री ज्ञानेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून श्री पळवडे यांनी रुग्ण आणि हॉस्पिटल मध्ये समन्वयक म्हणून काम करू, तसेच ग्रामीण भागात तांडे वाडी वस्ती वर जाऊन जनजागृती, प्रचार प्रसार विविध कॅम्पचे आयोजन , लोकसहभागातून डोनेशन, कॅम्प दरम्यान विविध वस्तू जमा करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. श्री सेवा भावी संस्थेच्या अध्यक्ष ॲड भाग्यश्री ढाकणे यांच्या वतीने बीड जिल्यातील महिलांच्या आरोग्य सुदृढ करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केल.
या बैठकी बाबत श्री. शरद झोडगे, डॉ. भीमसिंग मिसाळ, डॉ. राहुल सारडा , डॉ. प्रशांत सानप , डॉ. आशिष गरजे डॉ. विजयकुमार घोळवे, डॉ. प्रदीप शेळके यांनी आपापली मते मांडून समाधान व्यक्त केले व निरामय बीड उपक्रम यशस्वी करण्याचे मानस व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा