२४ पासून गुरुकुलात मुलांसाठी निवासी "मानवता संस्कार शिबिर"
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.१७
शहरी प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आत्मिक व सामाजिक विकास व्हावा आणि त्यांच्या अंगी मानवतेचे संस्कार रुजावेत, या पवित्र उद्देशाने महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व येथील आर्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमामध्ये येत्या २४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान मुलांसाठी *"मानवता संस्कार व आर्य वीर प्रशिक्षण" शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून आरोग्यसंपन्न, सक्षम , सभ्य, प्रामाणिक, नीतिसंपन्न, कर्तव्यदक्ष व संस्कारशील पिढीची निर्मिती होण्यास मदत मिळणार आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या निवासी संस्कार शिबिरात पहाटेपासून ते रात्रीपर्यंतच्या व्यस्त दिनचर्येत सकाळी व संध्याकाळी व्यायाम, योगासने, प्राणायाम, विविध खेळ यांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साधला जाईल. तर सकाळी संध्या, अग्निहोत्र, प्रार्थना, उपासनेच्या माध्यमाने धार्मिक व आध्यात्मिक संस्कार दिले जातील ,तर सकाळी व दुपारी प्रतिदिनी होणाऱ्या चार बौद्धिक सत्रात विविध अभ्यासू विचारवंतांच्या व्याख्यानांद्वारे मानव जीवन, ब्रह्मचर्य, मातृ-पितृसेवा, सदाचार, नम्रता, राष्ट्रभक्ती, सत्संग, भारतीय संस्कृतीची मूल्ये, मानवता, मूल्य शिक्षण, नैतिकता, पर्यावरण, विश्वबंधुत्व इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.
आजच्या मोबाईल, टीव्ही व इतर साधनांच्या अतिवापरामुळे व सध्याच्या भौतिक यांत्रिक जीवनपद्धतीमुळे विद्यार्थी शरीर व मनाने खचून चालला आहेत. तसेच आपल्या सांस्कृतिक मूल्यांपासून व नैसर्गिक वातावरणापासून तो दुरावत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी हे तन, मन व बुद्धीने परिपक्व आणि स्वावलंबी, धार्मिक, सद्व्यवहारी व चारित्र्यसंपन्न बनावेत, यादृष्टीने या शिबिरात प्रयत्न केले जातील. यात व्यायाम प्रशिक्षक काशिनाथ आर्य, ओमकार मोहनाळे, सोमेंद्र शास्त्री, पं. प्रतापसिंह चौहान, व्यंकटेश हालिंगे व इतर विद्वान मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जीवनोपयोगी वेदमंत्र आणि श्लोकांचे पाठांतर देखील करून घेण्यात येईल.
या शिबिरात इयत्ता सातवी वर्गाच्या पुढील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश शुल्क रुपये रु.५००/- ठेवण्यात आले आहे. तरी पालकांनी या शिबिरात आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी शिबिर संयोजक लक्ष्मणराव आर्य गुरुजी(९४२०२६९९२४ ), आचार्य सत्येन्द्रजी (९१५८४४५२८०), (रंगनाथ तिवार (९४२३४७२७९२), प्रा.डा.अरुण चव्हाण(९८९०३५५३४९), यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्य समाज परळीचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया, मंत्री श्री उग्रसेन राठौर, कोषाध्यक्ष श्री देविदासराव कावरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा