MB NEWS-परळीच्या पोलिस ठाण्यांना हवे आणखी पोलीस कर्मचारी; मनुष्यबळाअभावी कामकाजात मोठी समस्या
परळीच्या पोलिस ठाण्यांना हवे आणखी पोलीस कर्मचारी; मनुष्यबळाअभावी कामकाजात मोठी समस्या
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
परळी येथे तीन पोलिस ठाणे आहेत. मात्र या तीनही पोलीस ठाण्याला मनुष्यबळाची कमतरता असल्याने कामकाजात मोठी समस्या निर्माण होत आहे.परळीच्या पोलीस दलात आणखीन अधिकारी व कर्मचारी हवे असून शहर व तालुक्याची व्याप्ती लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ अत्यंत अपुरे असल्याचे समोर आले आहे.
परळी मध्ये एकूण तीन पोलीस ठाणे आहेत. शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे परंतु या तीनही ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे.ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत जवळपास तालुक्यातील 82 गावं येतात. या ठिकाणी 65 मंजूर पदांची मागणी आहे परंतु सद्यस्थितीला या ठिकाणी केवळ चोवीस कर्मचारी कार्यरत आहेत. शहर पोलिस ठाण्याची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नाही. शहर पोलीस ठाण्यात एकूण १३२ पदांची मंजुरी आहे परंतु इथे 49 कर्मचारी कार्यरत आहेत. संभाजीनगर पोलीस ठाण्यात मंजूर पदे 115 असून सद्यस्थितीला केवळ 48 कर्मचारी कार्यरत आहेत.तीन्ही पोलीस ठाण्यात मिळुन तब्बल १९२ पदे रिक्त आहेत.
उपलब्ध पोलीस कर्मचार्यांपैकी साप्ताहिक सुट्टी, कोर्ट ड्युटी, लोकप्रतिनिधी निवासस्थान बंदोबस्त, प्रासंगिक बंदोबस्त आदी ठिकाणी अनेक कर्मचारी गुंतलेले असतात तर ठाण्यात ठाणे अंमलदार,रिपोर्टिंग किम, आॅनलाईन कामकाज, गोपनीय शाखा या ठिकाणी बरेचसे कर्मचारी गुंतुन पडतात. मनुष्यबळाची कमतरता ही खुप मोठी समस्या परळी पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाली आहे.त्यामुळे परळीला नावाला तीन पोलीस ठाणे असले तरी मनुष्यबळ नसल्याने कामकाजात मोठ्या समस्या निर्माण होतात.तरी परळीला आणखी मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
शहर व तालुक्याची अंदाजे लोकसंख्या साडेतीन लाखाच्या आसपास आहे. या लोकसंख्येसाठी तालुक्यात ४ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. यामध्ये सिरसाळा, शहर ,संभाजीनगर, ग्रामीण पोलीस ठाणे आहेत. यातील शहरात संभाजीनगर, शहर व ग्रामीण पोलीस ठाणे कार्यरत आहेत. या पोलीस ठाण्यात तब्बल १९१ जागा रिक्त आहेत. शहरात जवळपास १ लाखाच्या वर लोकसंख्या आहे. यामुळे शहरात ज्या काही घटना घडतात यासाठी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. शहर पोलीस ठाण्यांतर्गत वैद्यनाथ मंदिर, नगरपालिका, पंचायत समिती, तहसील, कृषी विभाग, सिंचन विभाग, न्यायालय, शासकीय विश्रामगृह , पाटबंधारे विभाग शहरांतर्गत येतात. वैद्यनाथ मंदिर बंद असले तरी सुरक्षेसाठी तीन कर्मचारी कार्यरत आहेत.
सध्या ग्रामीण पोलीस ठाण्यास कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. तसेच चार अधिकाऱ्यांची फक्त पदे मंजूर आहेत.यात पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक दोन अशी पदे असून ही पदे कार्यरत आहेत पण पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कारभार पाहता आणखी अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. या संकट काळात संपूर्ण भार हा पोलीस ठाण्यावर आहे. अशा संकट काळात स्वतःची काळजी घेत ठाण्याचा कारभार संभाळणे अवघड होवून बसले. अशा काळात कारभार पाहण्यासाठी आणखी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कारण कंटोन्मेट झोन मध्ये बंदोबस्त लावणे, रोजची पेट्रोलिंग, जिल्ह्याच्या सिमेवर बंदोबस्त ठेवणे आदी कामाबरोबरच ८२ गावात घडणाऱ्या घटना, चोरी आदिंचा शोध घेणे ही सर्व नेहमीची कामे तर करावी लागत आहेत. त्यामुळे येथील ग्रामीण पोलीस ठाण्यास आणखी पोलीस कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे. तसेच हे सर्व काम करण्यासाठी आवश्यक आहे ती गाडी, ग्रामीण पोलीस ठाण्यास एकच गाडी असून ती पण जुने माँडेल आहे. वाढता कारभार लक्षात घेता किमान आणखी दोन चारचाकी गाड्यांची आवश्यकता आहे.
---------------------------------------------------
शहरात वाहतूक शाखा मंजूर पण पदे रिक्त...
शहरातील मुख्य बाजारपेठेत व इतर प्रमुख रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. बाजारपेठ सुरू असताना कोठेही पोलीस कर्मचारी दिसून येत नाही. यामुळे बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडी व चोरीच्या घटना घडत असतात. यासाठी शहरातील वाहतूक समस्यांचा विचार करता येथे स्वतंत्र वाहतूक शाखा सूरु करणे आवश्यक आहे. त्याकरीता स्वतंत्र १ अधिकारी व त्यांचे अधिपत्याखाली १० कर्मचारी वाहतूक सुरूळीत ठेवतील.
-----------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा