लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला आता विधानसभा निवडणुकीतही पाडा
महाविकास आघाडी सरकार पाडणाऱ्यांना धडा शिकवा- जयसिंग गायकवाड
लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला आता विधानसभा निवडणुकीतही पाडा
परळी,(प्रतिनिधी):- राज्यात द्वेषाचे राजकारण करणारे भाजप सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला पर्यायी सरकार दिले होते. मात्र केंद्रातील अदृश्य शक्तीच्या माध्यमातून षडयंत्रकरुन यांनी महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर न्यायालयानेही निकाल दिला नाही. मात्र आता जनतेने लोकसभेप्रमाणे विधानसभेला यांना धडा शिकवून न्याय द्यावा, असे आवाहन परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.खा. जयसिंग गायकवाड यांनी केले आहे. ते परळी विधानसभा मतदारसंघातील मोजे नागापूर येथे मतदारांशी संवाद साधताना बोलत होते.
परळी विधानसभा मतदारसंघातील नागापूर जिल्हा परिषद सर्कल मधील दोनापूर, वानटाकळी, अस्वलआंबा, नागपिंपरी, बोधेगाव, कावळ्याचीवाडी, वाघाळा, गोपाळपूर, माळहिवरा, तडोळी, बहादूरवाडी, डाबी आदी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थानी श्रीराम गायके होते. कॉ. उत्तमदादा माने, कैलास सोळंके, यांच्यासह परिसरातील मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार जयसिंग गायकवाड यांनी महायुती सरकारवर सडकून टीका म्हणाले की, जनतेने लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला आहे. विधानसभा निवडणुकीतही जनता महाविकास आघाडीच्या मागे आहे.
महाविकास आघाडीच्या पंचसूत्री बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा.जयसिंग गायकवाड यांनी जनतेला माहिती दिली. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना तीन हजार रुपये देणार आहोत. येणाऱया काळामध्ये लाडकी बहीण महालक्ष्मीच्या रुपाने येणार आहे. तसेच महविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर महिलांना बसचा प्रवास मोफत करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपये आरोग्य संरक्षण विमा असेल, शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्जमाफी, युवकांना रोजगार, जातीय जनगणना असे सर्वसमावेशक लोकहिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकार पंचसूत्रीच्या माध्यमातून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा