पैसे मिळणे तर दूरच पण मनस्ताप सहन करण्याची वेळ !
सरकारी कारभार- नागरिक बेजार:एक वर्ष उलटले, विंधन विहीर अधिगृहणाचे पैसे द्या: हिवरा(गो) येथे ग्रामस्थांचे उपोषण
गेल्यावर्षी अधिगृहण केलं,साडेतीन महिने पाणी वापरलं, पण आता 14 दिवसाचाच आदेश काढला; शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही नाही
परळी वैजनाथ प्रतिनिधी....
सरकारी कारभार आणि नागरिक बेजार अशी नेहमीचीच अवस्था बघायला मिळते. प्रशासकीय प्रक्रियेत कधी कोणती कामे अडून बसतील आणि कधी कोणती कामे क्षणार्धात निपटली जातील हे प्रशासनातील कर्मचारीच कळू जाणे. असाच काहीसा प्रकार परळी तालुक्यातील हिवरा येथील काही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या काळात विंधनविहीर (बोअरवेल) अधिग्रहण केलेल्या तीन ग्रामस्थांना एक वर्ष उलटून गेल्यानंतर एक रुपयाही हाताला लागलेला तर नाहीच पण ग्रामपंचायत, तहसील, पंचायत समिती अशा चकरा मारून मनस्ताप सहन करण्याची वेळ मात्र नक्की आलेली आहे. या ग्रामस्थांनी आता गावातच ग्रामपंचायती समोर आपल्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.परळी वैजनाथ तालुक्यातील हिवरा ( गो.) या गावात गेल्या वर्षी(2024) प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारण करण्यासाठी नागरिकांच्या मालकीच्या खाजगी विंधन विहिरी (बोअरवेल) अधिग्रहण केले होते. साडेतीन महिने या विंधनविहिरींवरून ग्रामपंचायतीमार्फत गावाला पाणीपुरवठा केला. मात्र एक वर्ष उलटून गेल्यानंतरही विंधनविहीर अधिग्रहणाचे देयक मात्र प्रशासकीय जुमल्यामध्ये अडकून बसले आहे. विशेष म्हणजे या नागरिकांच्या विंधनविहिरीतून साडेतीन महिने पाणी वापरण्यात आलेले आहे. मात्र अधिक माहिती घेतली असता महसूल प्रशासनाकडून याबाबतची केवळ 14 दिवसाची ऑर्डर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही ऑर्डर महसूल प्रशासनाकडून देयक अदा करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी अजून पंचायत समितीकडे आलेली नाही. त्यामुळे नेमकी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न या नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
हे सर्व गेल्यावर्षी घडले.एक वर्षानंतरही पैसे मिळणे तर दूरच पण मनस्ताप सहन करण्याची वेळ आमच्यावर आल्याची संतप्त भावना हे नागरिक व्यक्त करीत आहेत. एकतर साडेतीन महिने पाणी दिल्यानंतर ऑर्डर केवळ 14 दिवसाची का? हा मुळ प्रश्न आहे. त्यातही सर्वच ठिकाणी उडवाउडवी आणि असमाधानकारक अशी उत्तरे त्यांना मिळत आहेत या सर्व प्रक्रियेला त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर आपल्या गावातच ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. हिवरा (गो.) या गावातील तीन शेतकर्यांनी आज सकाळपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सौ.मंडोदरी शेषराव चौधरी ,उत्तमराव नारायणराव गंगणे, केशव पंडीत वाघमारे या नागरिकांनी हे उपोषण सुरू केले असुन प्रशासनाने या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा