ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती
'दादांना भेटायला जायचंय' म्हणत दादांच्या आईंची पायीच धाव; काळीज हेलावणारा प्रसंग..
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या मातोश्रींची झालेली अवस्था पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
सकाळी साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अपघाताची बातमी झळकताच, फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यावेळी दादांच्या आई टीव्ही पाहत होत्या. "अरे, दादांचा अपघात झालाय का?" अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, सत्य समजल्यास त्यांना मोठा धक्का बसेल, या भीतीने व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी तातडीने टीव्हीची केबल कापली आणि आईंचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकला.
आईंना केवळ किरकोळ खरचटल्याचे सांगून धीर देण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, लेकाच्या काळजीपोटी त्या व्याकुळ झाल्या आणि "मला दादाला भेटायला घेऊन चला" असे म्हणत फार्म हाऊसच्या बाहेर पायीच चालू लागल्या. अखेर नाईलाजाने त्यांना बारामतीतील निवासस्थानी नेण्यात आले.
अवघ्या चार दिवसांपूर्वीच, शनिवारी सकाळी साडेसात वाजता दादांनी आईची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊण तास गप्पा मारल्या होत्या. शेतात नवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचना देत त्यांनी कर्मचाऱ्यांचीही आपुलकीने चौकशी केली होती. नियतीच्या क्रूर घातामुळे ही त्यांची शेवटची भेट ठरली असून, राज्याने एक कणखर नेतृत्व गमावले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा