खळबळ घटना: किराणा दुकानात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला
धारूर: तालुक्यातील पहाडी दहिफळ येथे शरद आश्रुबा धनवे (वय ४५, रा. सोन्नाखोटा) या व्यक्तीचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातीलच एका किराणा दुकानात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेनंतर धनवे यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
या घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक गिराम आणि पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगत पहाटे दोन वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवला. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून धारूर पोलीस विविध अंगांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात असल्याचा संशय असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि गुन्ह्याची अचूक दिशा स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा