सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी
हरित परळी अभियानासाठी आज नियोजन बैठक; मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहर अधिक हिरवेगार, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने नगर परिषद परळीच्या वतीने लवकरच शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासाठी रविवार, दि. २१ रोजी सकाळी ७ वाजता जिजामाता उद्यान येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली.
या बैठकीस ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वृक्ष लागवडीसाठी योग्य स्थळांची निवड, वृक्षसंवर्धनाची कार्यपद्धती तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. सध्या वाढते तापमान, घटते पर्जन्यमान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने जगासमोर उभी आहेत. या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचे नगराध्यक्षा धर्माधिकारी यांनी सांगितले. शहरातील तापमान नियंत्रणात ठेवणे, भूजल पातळीत वाढ करणे, पर्जन्यमानाला पोषक वातावरण निर्माण करणे आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण उपलब्ध करून देणे या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एक वृक्ष म्हणजे केवळ झाड नव्हे, तर भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. चला, आपण सर्वजण मिळून परळीला महाराष्ट्रातील आदर्श हरित शहर बनविण्याचा संकल्प करूया. त्यामुळे या बैठकीस नगर परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा