परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे
शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन करताना सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असून त्यांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले."शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रसारमाध्यमांनी करावे," असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतात लोकशाहीतील प्रसारमाध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. वर्तमानपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात," असे त्या म्हणाल्या.निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि समाजहिताच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता केली गेल्यास लोकशाही अधिक सक्षम आणि बळकट होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते भास्कर चाटे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत मुंडे सर व बंडू आघाव सर यांनी केले.या कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपादक बालकिशन सोनी व न्याय टाइम्स परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा