युवकांचा स्तुत्य उपक्रम....
परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी परळी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना निवेदन
विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा विकास जनता परिषद आणि इतर विविध संघटनांच्या वतीने ८ जून रोजी करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम म्हणून दि. १८ जून रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपाळ कृष्णन यांनी, तर आज दि. २३ जून रोजी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांनी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवासी व विविध मागण्यांचा आढावा घेतला. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना दिले निवेदन दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे.
परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रवासी मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले. तसेच या सर्व मागण्या परळी आणि मराठवाड्यातील प्रवाशांच्या दृष्टीने कशा अत्यंत योग्य आणि न्याय्य आहेत, हे त्यांना पटवून दिले. मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सौरभ प्रकाश यांनी सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे सकारात्मक आश्वासन समितीला दिले.
निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
* गाडीचा विस्तार: सध्या धावणारी मुंबई-लातूर एक्सप्रेस परळी वैजनाथ किंवा नांदेडपर्यंत वाढवण्यात यावी.
* डब्यांमध्ये वाढ: नांदेड ते पनवेल गाडीला प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता ती २१ डब्यांची करण्यात यावी. तसेच, निजामाबाद ते पंढरपूर या गाडीला वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी सध्याच्या ९ ऐवजी १६ डबे जोडण्यात यावेत.
* नवीन रेल्वे गाड्या: बिदर ते नांदेड दरम्यान नवीन गाडी सुरू करावी. यासोबतच, परळी वैजनाथ-परभणी-छत्रपती संभाजीनगर-नाशिक मार्गे मुंबईसाठी नवीन रेल्वे गाडी आणि हैदराबाद ते अजमेर (परळी वैजनाथ मार्गे) एक्सप्रेस सुरू करण्यात यावी.
* अमृत भारत योजना: परळी रेल्वे स्थानक येथे केंद्र सरकारच्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणि विहित वेळेत पूर्ण करण्यात यावीत.
यावेळी परळी रेल्वे विकास समितीचे मुख्य निमंत्रक व मार्गदर्शक जी. एस. सौंदळे सर, मुख्य समन्वयक कैलास तांदळे,मार्गदर्शक सत्यनारायण दुबे सर यांच्यासह विविध संघटनांचे इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा