ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
ग्रामीण साहित्यातील पिंपळपान निखळले
------ ----- --------------------
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे हे मराठी ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचे नाव . त्यांच्या साहित्यात ग्रामीण जीवनातील वास्तव, सामाजिक प्रश्न, नात्यागोत्यातील गुंफण आणि माणसांच्या भावनांचे चित्रण आढळते.त्यांनी साहित्याचे सर्वच प्रकार हाताळले. त्यांचे लोकप्रिय कथासंग्रह; पेरणी (१९६२) , मळणी (१९६७) ,कणसं आणि कडबा (१९७४) ,नातीगोती (१९७५) , बोळवण (१९७६), माळरान (१९७६),राखण (१९७७), हरिणी (२०००).
त्यांच्या कादंबरी लेखनाने मराठी कादंबरी विश्व समृद्ध झाले आहे. यात पाचोळा (१९७१) , सावट (१९८७) , चारापाणी (१९९०) ,आमदार सौभाग्यवती (१९८८) आमदार सौभाग्यवती कादंबरीचा नाट्याविष्कार प्रख्यात रंगकर्मी प्रा. कुमार देशमुख यांनी दिग्दर्शित केला होता. पाचोळा कादंबरीचे नाट्यरूपांतर व चित्रपट निर्मिती अंकुशराव कदम यांनी तर दिग्दर्शन महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील फिल्म विभागाचे प्रा.शिव कदम यांनी केले आहे.
त्यांची अनुभव कथने वेगवेगळ्या धाटणीची आहेत.यात ग्रामीण साहित्य (१९९२), तिळा तिळा डिकी उघड (२००२), शेवटचा प्रश्न (२००२), एकदा असं झालं (२०११),अनुबंधाची पेरणी (२०१८) इत्यादि.
रा. रं. बोराडे यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये:-
ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण त्यांच्या साहित्यात आढळते. सामाजिक प्रश्नांची समग्र मांडणी त्यांनी केली.
नात्यागोत्यातील गुंफण आणि मानवी भावनांचे चित्रण त्यांनी केले. मराठवाडी बोलीभाषेचा वापर त्यांनी आपल्या साहित्यामधून केला.कथा-कादंबऱ्यांचा शेवट धक्कादायक आणि वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.
*रा. रं. बोराडे यांचे साहित्यातील योगदान:*-
ग्रामीण साहित्याला नवी दिशा दिली.अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले.ग्रामीण जीवनातील समस्या व प्रश्नांवर प्रकाश टाकला. मराठवाडी बोलीभाषेला साहित्यिक मान्यता मिळवून दिली.
रा. रं. बोराडे यांच्या साहित्याचा अभ्यास करून, आपण ग्रामीण जीवनातील अनेक गोष्टी समजू शकतो. त्यांच्या लेखनातून आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो, जो आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो.
*डॉ. रावसाहेब बोराडे: ग्रामीण साहित्याचे प्रेरणास्थान:-*
आज आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत, ज्यांनी ग्रामीण साहित्याला नवी दिशा दिली, अनेक लेखकांना मार्गदर्शन केले आणि साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात मोलाची भर घातली. ते म्हणजे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रावसाहेब बोराडे सर.
अनेक लिहित्या हातांना लेखन बळ देणारे ऊर्जास्रोत प्राचार्य डॉ. रा. रं.बोराडे सरांनी अनेक नवोदित लेखकांना हक्काचा साहित्य मंच उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील लेखक, कवी आणि नवोदित साहित्यिकांच्या लेखनाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील समस्या, सुख-दुःख, आशा-आकांक्षा प्रतिबिंबित होतात. 'प्राचार्य डॉ. रा.रं. बोराडे ' हे केवळ एक साहित्यिक नव्हते, तर अनेक लिहित्या हातांना लेखन बळ देणारे ऊर्जास्रोत होते. प्राचार्य डॉ. रा. रं.बोराडे सरांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक नवीन योजना सुरू झाल्या, ज्यामुळे राज्यातील साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण समृद्ध झाले. ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म अभ्यासक डॉ. बोराडे सरांना 'पाचोळाकार' म्हणून ओळखले जाते. त्यांच्या लेखनात ग्रामीण जीवनातील अनेक पैलूंचे सूक्ष्म निरीक्षण दिसून येते. त्यांनी माणसांच्या भावना, त्यांची नाती, त्यांच्या समस्या, त्यांच्या आशा-आकांक्षा अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्या. त्यांच्या कथा-कादंबऱ्या वाचताना वाचकाला ग्रामीण जीवनाचा अनुभव येतो. ग्रामीण साहित्याला त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित आणि डॉ. सिद्धार्थ तायडे अभिनित-सहदिग्दर्शित 'शिरमी' लघुपट विशेष चर्चा सत्र व सत्कार सोहळ्यात आदरणीय बोराडे सरांनी आमचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तसेच मैलाचा दगड ठरलेल्या 'पाचोळा' कादंबरीच्या पन्नास वर्षे पूर्ती सोहळ्यात आदरणीय बोराडे सरांची अखेरची भेट झाली. त्यांच्या सहवासाने आम्ही समृद्ध झालो. त्यांची आठवण नेहमी आपल्या मनात राहील.
ग्रामीण साहित्यातील पिंपळपान,अनेक लिहित्या हातांना लेखन बळ देणारे ऊर्जास्रोत माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ, जेष्ठ साहित्यिक पाचोळाकार आदरणीय प्राचार्य डॉ. रावसाहेब बोराडे सरांना सविनय आदरांजली...!
- प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे
नाट्यशास्त्र विभागप्रमुख, संत रामदास महाविद्यालय,घनसावंगी.
9822836675
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा