परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी विजयादशमी पथसंचलन उत्साहात
देशाच्या जडण घडणीत अतिशय महत्त्वाचा वाटा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परळीत आयोजित शताब्दी विजयादशमी पथसंचलन दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पावलांतून पथ संचलनाद्वारे विविध भागांमध्ये राष्ट्रभक्तीची लहर पसरवल्याचे दिसून आले.
चिंतामणी फाउंडेशन स्कूल तोतला मैदान परळी वै. येथून रविवार 5 ऑक्टोबर दुपारी 4 वा. पथसंचलन प्रारंभ झाले.चिंतामणी फाउंडेशन स्कूल - डॉ हडबे हॉस्पिटल - सोनार लाईन - राणी लक्ष्मीबाई टॉवर - गणेशपार - नांदूरवेस - सरकारवाडा- आंबेवेस - तळ नगरेश्वर चौक (आर्य वैश्य ) - चिंतामणी फाउंडेशन स्कूल येथे समारोप झाला.नेहमीप्रमाणेच अतिशय नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे पथ संचलन करण्यात आले. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या पथसंचलनाच्या माध्यमातून संघाच्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. तर हे पथसंचलन जाणाऱ्या मार्गावरील शिंदे मळा बैठक, गजानन महाराज मंदिर, इस्कॉन कल्याण, सुंदर नगरसह विविध संस्था आणि सोसायटींकडून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले.
संघाचा भाग होणे हे केवळ सन्मानाचे नव्हे तर राष्ट्रचेतना जागवणारे अनुभव आहे. आपल्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे. संघटन, राष्ट्रभक्ती आणि शिस्त ही संघाची खरी ताकद आहे,अशी भावना यावेळी डाॅ.राजाराम मुंडे यांनी व्यक्त केली. व्यक्तिमत्व विकास, समाजाशी घट्ट नातं जोडण्याची प्रेरणा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देण्याची शिकवण हीच संघाची खरी ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच “संघाचे पथसंचलन हे केवळ शिस्तबद्ध रांगेतून चालणे नाही, तर तो राष्ट्रशक्तीचा साक्षात्कार आहे. यामुळे स्वयंसेवकांमध्ये दृढविश्वास, आत्मबल आणि देशासाठी सेवा करण्याची प्रेरणा निर्माण होत असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा