ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परळीत शानदार दर्पण दिन व मूकनायक दिन सोहळा :आदर्श पत्रकारिता पुरस्कारांचेही वितरण
पत्रकारिता, अर्थकारण आणि राजकारण यांनी जबाबदार काम केलं तरच सजग समाजाची जडणघडण - ज्येष्ठ विचारवंत संपादक यमाजी मालकर
सकारात्मक पत्रकारिता सर्वश्रेष्ठ ;व्यथा मांडून, दिशा देत मार्गदर्शकाची भूमिका पत्रकार करतात - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
पत्रकारिता, अर्थकारण आणि राजकारण यांनी हातात हात घालून समाज उभा करण्याची उदात्त भावना ठेवत जबाबदार काम केले तर निश्चितच सजग समाजाची जडणघडण होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ज्येष्ठ विचारवंत संपादक यमाजी मालकर यांनी केले. तर सकारात्मक पत्रकारिता ही सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पत्रकारांची भूमिका ही दिशादर्शकाची असते. समाजाच्या वेदना, व्यथा मांडून एक सकारात्मक दिशा देत मार्गदर्शकाची भूमिका पत्रकार करत असतात अशी भावना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. परळी येथे अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित दर्पण दिन व मूकनायक सोहळ्यात मान्यवर बोलत होते.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परळी वैजनाथ येथे दर्पण दिन व मूकनायक दिन समारंभाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात झालेल्या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी परळीतील ज्येष्ठ पत्रकार शंकरआप्पा मोगरकर हे होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत संपादक यमाजी मालकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, रिपाई नेते सचिन कागदे, ज्येष्ठ पत्रकार अनंत भातांगळे, कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख ,माऊंट लिटेरा स्कूलचे उपाध्यक्ष कैलास घुगे, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक सुभाष चौरे, विभागीय सचिव रवी उबाळे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे, कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर ,डॉ. शालिनी कराड व डॉ.बालासाहेब कराड यांच्यासह परळीतील संपादक बालासाहेब कडबाने ,ज्ञानोबा सुरवसे, रामप्रसाद गरड, राजेश साबणे, मोहन व्हावळे, बालासाहेब फड आदी मान्यवर उपस्थित होते.
या शानदार सोहळ्यात आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2026 चे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वश्री रामप्रसाद शर्मा यांना जीवन गौरव तर प्रा. रविंद्र जोशी, स्वानंद पाटील ,मिलिंद चोपडे यांना दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर दत्तात्रय काळे ,संभाजी मुंडे, सुकेशनी नाईकवाडे यांना मूकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कराड हॉस्पिटल च्या वतीने देण्यात येणारा रिपोर्टर ऑफ द इयर पुरस्कार प्रा. प्रवीण फुटके यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार दत्तात्रय काळे यांनी केले. पुरस्कार प्राप्त पत्रकारांच्या वतीने प्रातिनिधिक सत्काराला उत्तर प्रा.रविंद्र जोशी यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. राजकुमार एल्लावाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण फुटके यांनी केले.
यावेळी सविस्तर मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यमाजी मालकर यांनी पत्रकारितेची बदलती परिस्थिती आणि देशातील बदलत्या व्यवस्थांबाबत अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य केले. पत्रकारिता हा खऱ्या अर्थाने समाज घडवणारा मुख्य घटक असून या घटकाने आपल्या नैतिकतेपासून बाजूला गेल्यानंतर सामाजिक चांगली वाईट स्थित्यंतरे होतात. त्यामुळे जबाबदार पत्रकारितेची आजच्या युगात जास्त व नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या परिस्थितीत व बदलत्या पत्रकारितेत सत्य, संयम व तत्व टिकवून पत्रकारिता करणे हे अवघड असले तरी त्या उद्देशापासून पत्रकारांनी ढळले नाही पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताची अर्थव्यवस्था ही जगात तीन नंबरची अर्थव्यवस्था होत असून भारतासारखी नागरी वस्ती आणि गुण्यागोविंदाने राहणारी संस्कृती जगात कुठेही नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्वच क्षेत्रात बदल घडतात त्याप्रमाणे पत्रकारितेतही बदल घडत आहेत. नकारात्मकता पसरू न देणे ही खऱ्या अर्थाने नव्या बदलत्या युगामध्ये पत्रकारिते समोरील मोठी आव्हाने आहेत. ती सक्षमपणाने पत्रकारांनी पेलली पाहिजेत. भारत आज जगामध्ये अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर येत आहे, तांदळाचे उत्पादन जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे, गव्हाचे उत्पादन जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे, सर्वाधिक उपग्रह सोडणारा देश म्हणून आपली ओळख आहे, शहराच्या आर्थिक उलाढालीपेक्षा आपल्या ग्रामीण भारताची आर्थिक उलाढाल ही प्रगतिशील आहे. त्यामुळे आपण आपल्यालाच स्वतःलाच भाग्यवान समजले पाहिजे. नकारात्मकता सोडून सकारात्मक पद्धतीने आपले गाव, आपले राज्य, आपला देश समृद्ध करण्यासाठी अर्थकारण, राजकारण व पत्रकारिता यांनी हातात हात घालून जबाबदार काम करावे अशीच सजग समाज निर्मितीसाठी अपेक्षा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी पत्रकार परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष संपादक आत्मलिंग शेटे, तालुकाध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष किरण धोंड, तालुका सचिव दिगंबर देशमुख, शहर सचिव माणिक कोकाटे, मार्गदर्शक व सल्लागार प्रा. प्रवीण फुटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे परळी तालुका निमंत्रक जगदीश शिंदे, शहर उपाध्यक्ष अभिमान मस्के, तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड, कोषाध्यक्ष संदीप मस्के, परळी शहर कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी, परळी शहर कोषाध्यक्ष गणेश आदोडे, कोषाध्यक्ष संतोष बारटक्के, प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती खटिंग, कुंडलिक लहाने, कैलास डुमणे, पृथ्वीराज मस्के, कार्यकारणी सदस्य विजय रोडे, रमेश लहाने, दत्ता शिवगण, नरसिंग अन्नदास कैलास बजाज, विश्वजीत मस्के, बालासाहेब लोभे यांच्यासह परळीतील मान्यवर पत्रकार धनंजय आढाव, गोपाळ आंधळे,महादेव शिंदे, श्रीराम लांडगे, संजीव रॉय, सचिन मुंडे, भगवान साकसमुद्रे, गंगाखेड येथील पत्रकार संजय सुपेकर, विकास वाघमारे, आदिसह महिला महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, नागरिक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर्पण दिन व मूकनायक दिन परळी वैजनाथ सोहळ्यातील निवडक छायाचित्रे.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा