माळाकोळीत ना. पंकजाताई मुंडे यांचं जंगी स्वागत; लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार सोहळ्यात अनावरण
मुंडे साहेबांचा वारसा स्वाभिमान, तेज, त्याग व संघर्षाचा - ना.पंकजाताई मुंडे
माझ्या कातडयाचे जोडे केले तरी सर्व सामान्य जनतेच्या प्रेमाचे ऋण कधीही फिटणार नाही
नांदेड ।दिनांक ०५।
लोकनेते मुंडे साहेबांनी कधीही जात-पात, धर्म पंथ असं राजकारण केलं नाही. सर्व वंचित, उपेक्षित घटकांना एकत्र आणून त्यांची वज्रमुठ बांधली. ही वज्रमूठ निर्माण करून त्यांनी उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांचा वारसा हा सत्ता, संपत्तीचा नाही तर स्वाभिमान, तेज, त्याग आणि संघर्षाचा आहे, तो वारसा मी सदैव जपत वंचित, पिडितांची सेवा करणार आहे, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माळाकोळी (ता. लोहा) येथे साडेसहा कोटी रुपये लोक वर्गणी करून उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मृती भवनाचे लोकार्पण काल एका शानदार समारंभात करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, आ.तुषार राठोड, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, गोविंदराव केंद्रे, प्रा. मनोहर धोंडे, माळाकोळीचे सरपंच जनार्दन तिडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
*मिरवणूक अन् जेसीबीतून फुलांचा वर्षाव
माळाकोळी येथे आगमन होताच ना. पंकजाताई मुंडे यांचे ग्रामस्थांनी प्रचंड आत्मीययतेने स्वागत केले. बारा ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढून जेसीबीतून फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांचा प्रचंड उत्साह बघायला मिळाला. प्रारंभी पंकजाताई व मान्यवरांच्या शुभहस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
मुंडे साहेबांचे गारूड आजही प्रत्येकाच्या हृदयावर
यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांसारखा लोकनेता यापुढे होणे नाही. आज त्यांना जावून बारा वर्ष झाली पण आजही लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांचे गारुड प्रत्येकाच्या हृदयावर बिंबलेले दिसते.मराठवाडा असो की विदर्भ, कोकण असो की उत्तर महाराष्ट्र एवढेच नव्हे तर परराज्यातही जिथे जाईल तिथे समोर बसलेला सर्व मुंडे परिवार आजही त्याच ताकदीने आपल्या या लोकनेत्याचा वारसा व वसा जपत असलेला दिसतो. हीच माझी खऱ्या अर्थाने ताकद आहे. हा आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा यासाठीच मी काम करत आहे.
*स्मारक दीपस्तंभ ठरेल
माळाकोळी येथे केवळ मुंडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारला नाही तर त्याच्या जोडीला व्यायामशाळा आणि वाचनालयही निर्माण करण्यात आले. ही कौतुकास्पद गोष्ट असून लोकनेते मुंडे साहेबांना अभिप्रेत अशा पद्धतीने निरामय आरोग्यासाठी व्यायामशाळा आणि शिकून जीवन घडविण्यासाठी वाचनालय ही खरोखर सामाजिक बांधिलकीची बाब या ठिकाणी निर्माण झाली आहे याचा आपल्याला आनंद आहे. माळाकोळीचे मुंडे साहेबांवर विशेष प्रेम होते. ते प्रेम आपल्यावरही आहे. येणाऱ्या काळात माळाकोळीतील हा पूर्णाकृती पुतळा एक दीपस्तंभ म्हणून काम करेल असा विश्वास यावेळी पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.
*हा विलक्षण योगायोग
आज राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी व त्यानिमित्त लोकनेते मुंडे साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. 'दोन एकर विका पण शिक्षण शिका' असा संदेश संत भगवान बाबांनी दिला आणि समाजाला शिकल्यानंतर आरक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणारे दिवंगत लोकनेते मुंडे साहेब होते. त्यामुळे राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पुण्यतिथी दिवशी मुंडेसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह व्यायाम शाळा आणि वाचनालय हा योगायोग विलक्षण आहे. मुंडे साहेबांनी माळाकोळी मध्ये दारूबंदी केली होती. त्याचबरोबर याच माळाकोळीतून उसाची झोनबंदी उठवण्याची मागणी शंकराअण्णा धोंडगे यांनी केली होती. मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती बंदीही उठवली. यासह अनेक आठवणी यावेळी सांगण्यात आल्या. मुंडे साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे माळाकोळीचा पाणीप्रश्न मी ग्रामविकास मंत्री असताना सोडवून दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी वचन दिल्याप्रमाणे हे माळाकोळी गाव मी दत्तक घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वज्रमुठ कायम ठेवा
मुंडे साहेबांनी कधीही जात-पात, धर्म पंथ असं राजकारण केलं नाही. सर्व वंचित, उपेक्षित घटकांना एकत्र आणून त्यांची वज्रमुठ बांधली. ही वज्रमूठ निर्माण करून त्यांनी उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. शिकलेल्यांना आरक्षणाची संधी दिली आणि जीवन घडवण्याचे काम केलं. ही वज्रमुठ हीच आपली ताकद असून वेगवेगळ्या बोटांना महत्व नसतं तर एकत्रित वज्रमुठीला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे ही वज्रमुठ कायम ठेवा असे आवाहन यावेळी पंकजाताई यांनी केले.
मुंडे साहेबांच्या विचाराचं तेज, त्याग व संघर्ष हा वसा आपल्याला जपायचाय
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांची वज्रमुठ बांधून त्यांच्या विचारांचे तेज, मुंडे साहेबांचा त्याग व मुंडे साहेबांचा संघर्ष हे आपल्याला जपायचं आहे. मुंडे साहेबांना अभिप्रेत असा आरोग्यदायी, स्वाभिमानी, तेजस्वी, वेळप्रसंगी संघर्षाची तयारी असलेला व सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्या दृष्टिकोनातूनच आपण काम करत असून अजन्म हाच वसा आणि वारसा जिवापाड जपण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी सदैव आपले आशीर्वाद पाठीशी ठेवा असे आवाहन यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा