आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
संस्कार शिबिरांमुळे मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती शक्य !- उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर
परळी वैजनाथ, दि. २-
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धामुळे सर्वत्र चिंतेचे व अशांततेचे साम्राज्य पसरले असतानाच संस्कार शिबिरासारख्या प्रेरक उपक्रमांमुळे जगात प्रेम, सदाचार, दया, करुणा, सच्चारित्र्य, माणुसकी, सहिष्णुता आदी मानवी मूल्यांची जोपासना होऊन शांतता व सुख समृद्धी नांदू शकते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर यांनी केले.
परळी येथून जवळच असलेल्या नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या "मानवता संस्कार व आर्य वीर दल प्रशिक्षण" शिबिराचा काल विविध कार्यक्रमांनी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री लाटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाज परळीचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया हे होते.यावेळी श्री हरिसिंह आर्य (दिल्ली), निवृत्त नायब तहसीलदार श्री बाबुराव रुपनर, उग्रसेन राठौर, रंगनाथ तिवार , प्रशांतकुमार शास्त्री, डॉ. मधुसूदन काळे, आचार्य सत्येंद्रजी, श्री व्यंकटेश हालिंगे, स्वामी सोमानंद आदींची उपस्थिती होती.
श्री लाटकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्कार शिबिराच्या माध्यमातून आदर्श मानवाची निर्मिती होते, हे सांगून सध्या मोबाईल, व्यसनाधीनता व वाढत्या दुर्गुंणामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आर्य समाजाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या निसर्गोपचार चिकित्सा, वेदप्रसार, ध्यान योग, संस्कार शिबिरे इत्यादी उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. शरीर, मन व बुद्धीच्या विकासासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम राबविणे म्हणजे एक प्रकारे आदर्श समाजाच्या नवनिर्मितीकरिता उचलले गेलेले प्रेरक पाऊलच आहे, असे ते म्हणाले. अध्यक्ष समारंभात श्री लोहिया यांनी संस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो असे उद्गार काढले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा व दानदात्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्याचे मनोगत झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर शिबिरार्थ्यांनी व्यायाम, योगासने, लेझीम, काठी प्रदर्शन, विविध मनोरे यांचे उत्कृष्ट देखावे सादर केले. कार्यक्रमास पालक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्यायाम प्रशिक्षक सर्वश्री काशिनाथ आर्य, ओमकार मोहनाळे, कृष्णा आर्य यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मणराव आर्य गुरुजी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ .अरुण चव्हाण यांनी केले . शेवटी डॉ.नयनकुमार आचार्य यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा