महादेव कोळी, मल्हार कोळी प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी समाजबांधवांचे जिवघेण्या उन्हात तीन दिवसांपासून "अन्नत्याग आंदोलन"
आंदोलक आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांमधील चर्चा निष्फळ, प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्यागावर आंदोलक ठाम
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी बांधवांच्या प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी 8 समाजबांधवांनी जिवघेण्या उन्हात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जात पडताळणी अधिकारी आणि आंदोलकांमध्ये आज चर्चा झाली मात्र ती निष्फळ ठरली. तर प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजबाधव सहभागी होत आहेत. आंदोलन सुरू असेपर्यंत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला सध्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्राप्त करून घेण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. एव्हढे करूनही यश मिळत नाही. महादेव कोळी मल्हार कोळी या समाजाला सहज जातीचे प्रमाणपत्र मिळून वैधता मिळावी या प्रमुख मागणीसाठी समाजातील 8 बांधवांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. भर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे तीव्र आंदोलन तीन दिवसांपासून सुरू असुन रोज वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजबांधव सहभागी होत आहेत. काल सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिवघेण्या उन्हात 8 जणांचा अन्नत्याग
समाजाच्या अतिशय ज्वलंत प्रश्नांवर समाजातील 8 बांधवांनी जिवघेण्या उन्हात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. चंद्रहंस नलमले - निलंगा, अच्युतराव सोगे - सोनपेठ, शंकरराव गंगाधरे - परळी वैजनाथ, सौ. रेणुकाताई घोरपडे - पूर्णा, रोहिदास एम्बलवाड - पालम, गजानन चंदेवाड - अहमदपूर, सुभाष कांबळे - कळंब, संदीप गवळे - सिल्लोड हे समाजबांधव रविवार दि. 3 मेपासून अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातील समाजबांधव मोठ्या संख्येने संभाजीनगरमध्ये दाखल होत आहेत. आज 5 मे मंगळवारी परभणी जिल्ह्यातील बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
चर्चेत तोडगा नाही, आंदोलनावर ठाम
दरम्यान आज मराठवाडा विभागातील चारही अनुसूचित जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी आणि अन्नत्याग उपोषणकर्ते, अभ्यासक यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली. मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या पुराव्यांच्या बाबतीतही चर्चा झाली. पण तोडगा निघाला नाही. संशोधन अधिकारी आणि चारही सह आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून आयुक्त पुणे आणि सचिव आदिवासी विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागून घेऊ असे उपोषण स्थळी जातपडताळणी समितीच्या अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे. पण उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पुढील दिवसात ठरलेल्या नियोजनाप्रमाणे बाकीच्या जिल्ह्यातील (लातूर , नांदेड, बीड, धाराशिव, जालना आणि हिंगोली)बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषण स्थळी येऊन पाठिंबा देण्याची आव्हान उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा