असंघटित कामगारांना किमान ३० हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे; कॉम्रेड किरण मोघे यांचे प्रतिपादन
परळीत उत्साहात कामगार मेळावा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन म्हणून दरमहा ३० हजार रुपये मिळालेच पाहिजेत, ही 'सीटू'ची आग्रही भूमिका आहे, असे प्रतिपादन सीटू महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. किरण मोघे यांनी केले. बीड जिल्हा सीटूच्या वतीने जागतिक कामगार दिनानिमित्त परळी येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित कामगार मेळाव्यात त्या बोलत होत्या..
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी. जी. खाडे होते. यावेळी व्यासपीठावर आशा संघटनेच्या नेत्या कॉ. किरण सावजी, जालिंदर गिरी, सुनिता ताटे, शालेय पोषण आहार संघटनेचे नेते कॉ. प्रभाकर नागरगोजे आणि सुवर्णा रेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना कॉ. किरण मोघे म्हणाल्या की, १८८९ साली शिकागो येथील कामगारांच्या आंदोलनावर गोळीबार झाला होता. त्या बलिदानातून आणि कामगारांच्या प्रखर लढ्यातूनच '८ तास काम' असा जागतिक नियम ठरवण्यात आला. या लढ्याची आठवण म्हणून १ मे हा दिवस 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. मात्र, आजही देशात आशा व अंगणवाडी सेविकांसह अनेक कामगारांना १२ तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांसाठी कामगार कायद्यात बदल करून चार कामगार संहिता आणल्या आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आपल्या भाषणात त्यांनी कॉ. पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, "शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य निर्माण करणारे लोककल्याणकारी राजा होते. समाजात धर्माच्या नावावर फूट पाडणाऱ्या शक्तींना विरोध करणे हीच खरी लोकशाहीची मूल्ये आहेत."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. शेख जावेद यांनी केले, तर सूत्रसंचालन कॉ. प्रकाश वाघमारे यांनी केले. उपस्थितांचे आभार कॉ. नवाब मोमीन यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी बाबा शेख ,शेख फिरोज, संजय कसबे, पद्मीन रणदिवे, यमुना पाथरकर, अश्विनी कसबे, सुमित्रा सावंत आणि आशा लोडगे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा