मोबाईल परत देण्याचा बहाण्याने वृद्ध शेतकऱ्याच्या खात्यातील १ लाखांवर डल्ला!
धारूर: हारवलेला मोबाईल परत देण्याचे नाटक करून एका ६२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या बँक खात्यातून १ लाख रुपये लांबवल्याची धक्कादायक घटना धारूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, सायबर चोरट्यांच्या या नव्या पद्धतीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
धारूर येथील कसबा विभागात राहणारे सुधीर नारायण चंद्रे हे शेती आणि पुरोहितचे काम करतात. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७.४० च्या सुमारास ते आपल्या शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना टोलनाक्याच्या पुढे त्यांचा मोबाईल रस्त्यात कोठे तरी पडला. घरी आल्यावर मोबाईल नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलाने त्याच नंबरवर फोन केला असता तो समोरून एका व्यक्तीने उचलला. मोबाईल धारूरच्या घाटात सापडला असून तो घेऊन जा, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर दोन २० ते २५ वयोगटातील तरुणांनी घाटामध्ये चंद्रे यांच्या मुलाला मोबाईल परत केला.
मोबाईल हातात आल्यानंतर सुधीर चंद्रे यांनी आपले बँक बॅलन्स तपासले असता, त्यांच्या 'फोन पे' अॅपद्वारे रात्री ११.४७ आणि ११.४९ च्या सुमारास अनुक्रमे ७० हजार आणि ३० हजार असे एकूण १ लाख रुपये एका अज्ञात बँक खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले. मोबाईल सापडलेल्या व्यक्तीने त्याचा गैरवापर करून हा आर्थिक डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी सुधीर नारायण चंद्रे यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ आणि ३२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब किसन भवर हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा