जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊनच अनेक अधिकारी झाले!- नागरगोजे यांचे प्रतिपादन
इंदपवाडीच्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा!
परळी (प्रतिनिधी)
उत्कृष्ट भविष्याची वाटचाल विद्यार्थ्यांनी करावी यासाठी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच प्रवेश द्यावा असे आवाहन तालुक्याच्या कृषी अधिकारी प्रा डॉ अर्चना नागरगोजे यांनी उपस्थित पालकांना केले.
नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते. इयत्ता पहिलीला प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करणे, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करणे, त्यांच्या पावलांची ठसे घेऊन ती कायमस्वरूपी जतन करणे त्याचबरोबर शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशाचे वाटप करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाची तयारी उत्तम प्रकारे करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी फुग्यांची कमान उभारण्यात आली होती. इयत्ता सहावी -सातवीच्या विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी काढून परिसराची सजावट केली होती.
तालुक्याच्या कृषी अधिकारी प्रा डॉ अर्चना नागरगोजे यांच्यासह, सहाय्यक कृषी अधिकारी सौ हाडबे वाय एन, गावच्या सरपंच सौ शालुबाई फुलचंदराव मुंडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष केशवराव मुंडे, माजी सरपंच श्री फुलचंदराव मुंडे, शालेय शिक्षण समिती सदस्य श्री वैजनाथ मुंडे, शिक्षण प्रेमी नागरिक रामकृष्ण मुंडे यांच्यासह पालकांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिक्षक वृंदांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा डॉ अर्चना नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान मिळवण्याच्या खडतर मार्गाचा अवलंब करण्याचे सूचित केले त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान घेऊन पारंगत व्हा, मोठे अधिकारी व्हा असा सल्ला दिला. मध्यान भोजनामध्ये दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री जे के चौधरी, चंद्रप्रकाश लोखंडे, विष्णू ढाकणे, चंद्रशेखर फुटके, दीपक खंदारे आणि श्रीमती संध्या नागरगोजे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा