ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती
ग्रामीण माणुसकीचा दरारा हरपला : अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
आजच्या दुर्दैवी विमान अपघातात अजित दादा आपल्यातून गेले. काळाने राज्यातील एका उमद्या, कणखर आणि स्पष्टवक्त्या नेत्याला आपल्यातून हिरावून नेले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली.
शरद पवार साहेबांसारख्या दिग्गज नेत्यांचे पुतणे असल्यामुळे राज्याचे व्यापक राजकारण, नेते, प्रशासन व्यवस्था, सामान्य जनता आणि त्यांच्या प्रश्नांचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच जवळून घेता आला. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर पक्षात आणि नेतृत्वात लवकर स्थान मिळणे शक्य झाले, हे खरे असले तरी पुढे त्यांनी केवळ वारसा म्हणून नव्हे, तर मेहनत, कष्ट आणि ठाम भूमिकेच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
काकांमुळे संधी मिळाली, पण जेव्हा एखाद्या विषयावर पक्षाची भूमिका मनाला पटली नाही, तेव्हा त्यांनी ती निर्भीडपणे मांडली. अगदी शेवटी काकांपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, तरीही त्यांनी मनाविरुद्ध, न पटणारे काम कधीच केले नाही.
स्वतःला न पटणारी कामे त्यांनी रोकठोक नाकारली. ज्यांच्याशी विचार जुळत नाहीत, त्यांच्याशी अनावश्यक जवळीक ठेवण्याची भूमिका त्यांनी कधीच स्वीकारली नाही. “होण्यासारखे असेल तरच हो म्हणायचे, अन्यथा नियमानुसार किंवा माझ्याकडून हे शक्य नाही,” असे स्पष्ट सांगणारा असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच.
ग्रामीण भागातून मुंबईसारख्या महानगरात येऊनही, देश-विदेशात फिरूनही, त्यांनी आपली ग्रामीण ओळख कधीही लपवली नाही. ते कायम खेड्या-पाड्यातील सामान्य लोकांचे नेते राहिले. ग्रामीण भाषेतील शिवराळ शब्द, म्हणी भाषणात वापरण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना अनेकदा तीव्र टीकेला सामोरे जावे लागले, पण तरीही ते आपल्या लोकांमध्ये, आपल्या मातीमध्येच रमले. शहरीपणा त्यांनी कधी अंगीकारला नाही.
प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांवर त्यांचा प्रचंड दरारा होता आणि पक्षातही त्यांनी आपली शिस्त आणि धाक कायम ठेवला. इतके ऐश्वर्य हाताशी असतानाही त्यांनी साधेपणा जपला. कोणतेही व्यसन नव्हते. तंबाखू, गुटखा यांचा त्यांना तीव्र तिटकारा होता आणि इतरांनाही त्यापासून दूर राहण्याचा आग्रह ते नेहमी धरत.
रात्री दहा–साडेदहा वाजता झोपून सकाळी सात वाजता पक्षातील नेत्यांना बंगल्यावर भेटणारे, सकाळी नऊ ते अकरा कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारे आणि नंतर दिवसभर मंत्रालयात कामात गुंतलेले असे दादांसारखे नेते खरोखरच दुर्मीळ.
सामान्य नागरिक म्हणून आपला त्यांच्याशी थेट संपर्क येत नसला, तरी त्यांचा नेता म्हणूनचा प्रवास आपण रोज पाहत, वाचत असतो. त्यामुळे असे लोकनेते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. त्यांच्या अकाली, अचानक जाण्याने जणू घरातीलच एखादी व्यक्ती गेल्यासारखे दुःख मनाला चटका लावून जाते.अशा या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
दादांची आठवण कायम आपल्या मनात जिवंत राहील. 💐💐
— समीर येळंबकर, ठाणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा