मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त शिखरचे ३० वे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे देहावसान
नांदेड : तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय 95 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता माहूर गडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भक्तांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
सन 1978 पासून ते आजतागायत देवस्थानचे महंत म्हणून गादीवर विराजमान होते. तब्बल 4 तप (48 वर्षे) त्यांनी या गादीवर राहून तप:साधनेत व्यतित केले. ते वैकुंठवासी झाल्याने असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. दिवंगत महंत अच्युत भारती महाराज यांच्यानंतर १९७८ मध्ये विधिवत प्रक्रियेनुसार महंत मधुसूदनजी भारती महाराज हे श्री दत्तशिखर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले होते. तब्बल ४ तप म्हणजे ४८वर्षे त्यांनी गादीवर राहून तप:साधनेत जीवन व्यतीत केले.महंतजींच्या जीवनशैलीत साधेपणा व परंपरेचे काटेकोर पालन दिसून येत असे. त्यांनी कधीही वाहनाचा वापर केला नाही. मेणा सवारीत भोई समाजातील बांधव खांद्यावर मेणा वाहून नेत असत. सुमारे १६ भोई बंधू हा मेणा नांदेडपर्यंत घेऊन जात व परत आणत असत. दररोज १२ ते १४ किलोमीटरचा पायी प्रवास करत सार्वजनिक ठिकाणी मुक्काम करणे ही या यात्रेची वैशिष्ट्ये होती. महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने एक अध्यात्मिक परंपरेचा दीप विझला असून त्यांच्या स्मृती भाविकांच्या मनात कायम जिवंत राहतील.
मेणा सवारीचे आकर्षण
दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ पर्वणी काळात महंत महाराजांची पारंपरिक ‘मेणा सवारी’ ही भाविकांसाठी विशेष आकर्षण व श्रद्धेचा केंद्रबिंदू होती. या सवारीद्वारे ते माहूरगडावरून भोकर तालुक्यातून बासरपर्यंत आणि पुन्हा नांदेड जिल्ह्यात प्रवास करत असत. शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी गोदावरी तीरावर अभ्यंग स्नान करून पूजा-अर्चा केल्यानंतर ते पुन्हा माहूरगडाकडे प्रस्थान करत असत. हा धार्मिक प्रवास भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात होता.
खासदार अशोक चव्हाण यांनी अर्पण केली श्रद्धांजली
माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या देवाज्ञेमुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा व मानवतेचीही शिकवण दिली. माहूर गडावरील दत्त शिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा त्यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने जपली. महाराजांच्या रूपात एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण भक्तांच्या माध्यमातून सदैव अजरामर राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
माहूर (जि. नांदेड) येथील श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक दीपस्तंभ हरपला आहे. महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी अखंड कार्य केले. त्यांच्या साधेपणातच महानता होती आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना आध्यात्मिक दिशा मिळाली. माहूर गड व दत्त शिखराची गौरवशाली परंपरा त्यांनी अत्यंत निष्ठेने जपली. त्यांच्या निधनाने केवळ संस्थेचे नव्हे तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाले आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा