उपस्थित राहण्याचे आवाहन...
अश्वांच्या धावण्याच्या स्पर्धा २६ फेब्रुवारीला; अश्वपालकांना सहभागाचे आवाहन
परळी : मयूर हॉर्स रायडिंग क्लबतर्फे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही अश्वांच्या धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता वैद्यनाथ महाविद्यालय समोरील मैदान येथे करण्यात आले आहे. अश्वपालकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश चौधरी यांनी केले आहे.
या स्पर्धांची सुरुवात १९८० पासून झाली असून या उपक्रमाला मोठी परंपरा लाभली आहे. बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी संदीप बागची यांनीही या स्पर्धेत घोडेस्वारी करत प्रथम क्रमांक पटकावल्याची नोंद आहे. रैवाल चालीवरील घोड्यांच्या स्पर्धांची सुरुवात परळी वैजनाथ येथेच झाली. यापूर्वी अशा स्पर्धा प्रामुख्याने माळेगाव येथे गॅलपिंग प्रकारात होत असत. मात्र, त्या स्पर्धांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने डॉ. चौधरी यांनी सुरक्षित रैवाल चालीवरील स्पर्धांची संकल्पना सुरू केली.
डॉ. चौधरी यांच्याकडे ‘मयूर’ नावाचा अत्यंत उत्कृष्ट घोडा होता. त्याच्या मदतीने त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या. त्यांच्या उक्कडगाव येथील शेताजवळ तळ ठोकून बसलेल्या, पुणे पोलिसांना हवे असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यातही या घोड्याची मदत झाली होती. या घोड्याशी डॉ. चौधरी यांचे अतूट नाते होते.
परळी वैजनाथ येथे अश्वसंवर्धन आणि सुरक्षित घोडेस्वारीला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, परिसरातील अश्वपालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा