ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी
परळीत महाशिवरात्रीनिमित्त ४६ व्या राज्यस्तरीय अश्व शर्यतीचा थरार ; नांदेडच्या 'हिटलर' अश्वाने मारली बाजी
पुढील वर्षी पासून नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करणार –नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत महाशिवरात्रीचे औचित्य साधून मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने आयोजित ४६ व्या भव्य अश्व शर्यत स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला. अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत नांदेड येथील मनीष कावळे यांच्या 'हिटलर' अश्वाने प्रथम क्रमांक पटकावून मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. पुढील वर्षी पासून परळी वैजनाथ नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अभिवचन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी दिले.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने परळीतील प्रसिद्ध डॉक्टर आणि अश्वप्रेमी डॉ. सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. मागील अनेक वर्षांची ही परंपरा यावर्षीही मयूर हॉर्स रायडिंग क्लबने जपली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध जातींचे उच्च प्रतीचे अश्व दाखल झाले होते. या अटीतटीच्या स्पर्धेत नांदेडचे हिमांशू मनीष कावळे यांच्या 'हिटलर' अश्वाने प्रथम, तर त्यांच्याच 'रॉकी' अश्वाने द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक परभणी येथील समद खान पठाण यांच्या अश्वाने मिळवला. विजयी अश्व मालकांना परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी अश्वप्रेमी दिनकर मुंडे गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी, युवराज महाळणकर पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर भाई, मिलिंद घाडगे, साहेबराव चव्हाण, नंदकुमार दळवी, गुरुचरणसिंग सिद्धू, मनीष कावळे, विशाल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि पुढील वर्षी नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करून ती अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करेल, असा मानस व्यक्त केला. आयोजक डॉ. सुरेश चौधरी यांनी अश्वप्रेमींचा हा वारसा असाच पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माऊली तांदळे, शशी शेखर चौधरी, विशाल देशमुख, गणेश भट, लक्ष्मीकांत मुंडे, इद्रिस काकर, लहू हलगि यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून सुभाष नानेकर व आघाव सर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली, तर ॲड. शिवानंद फुटके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने अश्वप्रेमी नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा