ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी
परळी नगरपालिकेनेच दिली घरपट्टी-पाणीपट्टीची बेबाकी; मग थकबाकी कशी?
‘बेबाकी देणाऱ्यां मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करा’ — ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):घरपट्टी व पाणीपट्टीची अधिकृत बेबाकी स्वतः परळी नगरपालिकेने दिल्यानंतरही संबंधित नागरिकांना थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. “बेबाकी नगरपालिकेनेच दिली कशी, मग आज अचानक बाकी कशी?” असा थेट प्रश्न ज्ञानेश्वर राजमाने यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम नियमानुसार भरल्यानंतर ‘बेबाकी’ दाखले मिळाले होते. मात्र काही दिवसांतच त्याच खात्यांवर थकबाकी दाखवण्यात आली. या विसंगतीमुळे परळी नगरपरिषद प्रशासनातील अनागोंदी कारभारावर आणि कामकाजावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परळी नगरपरिषद प्रशासनानेच दिलेल्या बेबाकीची नोंद कशाच्या आधारावर करण्यात आली? संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नियमांची पडताळणी केली होती का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी ज्ञानेश्वर राजमाने यांनी केली आहे. ज्ञानेश्वर राजमाने यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की, “चूक कोणाची आहे हे निश्चित करा. बेबाकी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी ठरवा.” अन्यथा सर्वसामान्य करदात्यांवर अन्याय होईल आणि प्रशासनावरील विश्वास उडेल, अशी भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ६ मधील विनापरवाना नळजोडण्यांचा मुद्दाही ऐरणीवर आला असून, नियमित कर भरणाऱ्यांवर कारवाई आणि नियमभंग करणाऱ्यांकडे दुर्लक्ष का,? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकरणी नगरपरिषदेकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळाले नसले तरी, नागरिकांनी पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा