महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....
ग्लोबल विकास ट्रस्टच्या कामामुळे बीडमध्ये सकारात्मक परिवर्तन!
अंजली व अनिश दमानिया यांचा दोन दिवशीय कृषीकुल दौऱ्यात प्रभावी सुसंवाद
माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही भेट; शेती - मातीच्या विषयावर सखोल चर्चा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
कधीकाळी तीव्र दुष्काळ, शेतीचे अपयश आणि मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर यासाठी ओळखला जाणारा बीड जिल्हा आज हळूहळू सकारात्मक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिवर्तनामागे ग्लोबल विकास ट्रस्टच्या सातत्यपूर्ण आणि शाश्वत कामाची मोठी भूमिका असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. २०१२ साली बीड जिल्ह्यात प्रथम दौरा केल्याच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, “त्या वेळी अनेक गावांमध्ये अत्यंत विदारक परिस्थिती होती. पाण्याचा तीव्र दुष्काळ, शेती संकटात आणि गावात केवळ लहान मुले व वृद्धच दिसत असत. मात्र गेल्या काही वर्षांत झालेल्या कामांमुळे आज या परिस्थितीत लक्षणीय बदल झालेला दिसतो.”
त्या पुढे म्हणाल्या की, २०१६ पासून माझे बंधू मयंक गांधी आणि संजय परमार यांनी ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे हा बदल शक्य झाला आहे. फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन, आधुनिक तांत्रिक मार्गदर्शन आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेला आधार यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. परिणामी, शेतीकडे पुन्हा ओढ निर्माण झाली असून जिल्ह्यातील स्थलांतरालाही आळा बसला आहे. जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळे शेतीला पाणी उपलब्ध होणे ही या बदलाची सर्वात महत्त्वाची बाजू असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिरसाळा येथील ग्लोबल विकास ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या “कृषीकुल” प्रशिक्षण केंद्राला दिलेल्या दोन दिवसीय भेटीत अंजली दमानिया आणि त्यांचे पती अनिश दमानिया यांनी विविध उपक्रमांची सखोल पाहणी केली. डेमो प्लॉट्स, माती परीक्षण प्रयोगशाळा, जलसंधारण प्रयोगशाळा, पीक संरक्षण प्रयोगशाळा, सेंद्रिय शेती प्रयोग आणि बायोगॅस संयंत्र यांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेत संवाद साधला. यावेळी संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी सांगितले की, “देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या ध्येयाने आम्ही काम करत आहोत. हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक तंत्रज्ञान व प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र अजूनही अनेक अडचणी आहेत, शेतीसाठी आवश्यक रस्त्यांची कमतरता, प्रशासनाचे अपुरे सहकार्य आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे गंभीर आहेत.” या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी या कामात सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अनिश दमानिया, जे महाराष्ट्र शासनाच्या धोरणनिर्मिती संस्थेतील “मित्रा”चे सचिव आहेत, यांनी सांगितले की,“ग्लोबल विकास ट्रस्टमुळे हजारो शेतकऱ्यांचे जीवन बदलले आहे. अशा प्रकारचे काम करणाऱ्या संस्था अत्यंत कमी आहेत. या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात व्यापक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू.” तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रस्टसोबत समन्वयाने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या दौऱ्यादरम्यान बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तथा माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही कृषीकुलची पाहणी करून उपक्रमांची माहिती घेतली आणि ग्लोबल विकास ट्रस्टच्या कामाचे कौतुक केले. एकूणच, बीड जिल्ह्यातील बदलाची ही कहाणी केवळ प्रकल्पांची नाही, तर शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर उभ्या राहिलेल्या ग्रामीण पुनरुत्थानाची आहे—आणि त्यात कृषीकुलसारख्या उपक्रमांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.
कायम ग्लोबल विकास ट्रस्टच्या सोबत राहू - अंजली दमानिया
केवळ बिड जिल्यातील नव्हे तर राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ग्लोबल विकास ट्रस्ट ही संस्था काम करत आहे. जलनायक मयंक गांधी आणि संजय परमार यांच्या प्रयत्नातून संस्थेचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याचा मला मनस्वी आनंद असून, आगामी काळात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या ग्लोबल विकास ट्रस्टसोबत सर्व पातळीवर काम करणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बोलताना सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा