घाटनांदूर रेल्वेथांब्यासाठी प्रस्ताव द्या..
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा
रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश
बीड: मागील दोन वर्षात रेल्वे कामाला गती दिलेली आहे. आता रेल्वेचे काम युध्द पातळीवर करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, शिवाय बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासहित ग्रामीण मार्गावरील ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या हॉलमध्ये रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध प्रलंबित कामे, भूसंपादन, निकृष्ट दर्जा, अपघातप्रवण ठिकाणे व नागरिकांच्या अडचणी यांसह सर्वच मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खा.बजरंग सोनवणे यांनी बैठकीत अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्थित केला. अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दुरुस्ती, पिंपळा धायगुडा-लोखंडी सावरगाव-केज-मांजरसुंबा-पाटोदा-चुंबळी फाटा हा रस्ता दुहेरी करणे, तसेच अंबाजोगाईतील यशवंतराव चव्हाण चौकात फूटओव्हर ब्रिज उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची सद्यस्थितीही तपासण्यात आली. खरवंडी-मादळमोही-पाडळसिंगी-गढी-माजलगाव मार्गावरील खराब रस्त्यामुळे होत असलेल्या अपघातांबाबत तक्रारी येत आहेत. तालखेड फाटा, शृंगारवाडी फाटा यांसह विविध ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. माजलगाव-धारूर-केज (रामा ५४८ सी) रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने संबंधित एजन्सीकडून तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. धारूर घाटातील थेटेगव्हाण पर्यायी मार्ग, तसेच बर्दापूर-लोखंडी सावरगाव दुहेरीकरणाच्या निविदांबाबत माहिती घेण्यात आली. पाटोदा व आष्टी तालुक्यातील अंमळनेर-टाकळी काजी तसेच गेवराईतील राक्षसभुवन फाटा-उमापूर-शेवगाव या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
पालखी मार्गाबाबत नाराजी
१ पैठण-पंढरपूर मार्गावरील डोंगरकिन्ही ते पारगाव (अनपटवाडी) या भागातील अत्यंत खराब रस्ता, मळेकर घाटातील अपूर्ण कामे, मोठ्या भेगा व अपघातांची मालिका यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
२ पाटोदा शहरातील अपूर्ण रस्ता काम निकषानुसार पुन्हा करण्याचे, एजन्सीवर कारवाई व अनावश्यक खर्चाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
खोदलेल्या रस्त्याकडे लक्ष
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे खोदलेला रस्ता तातडीने सुरू करण्याचे, तेलगाव येथे साचणारे पावसाचे पाणी काढण्याचे, तसेच मांजरसुंबा-अंबाजोगाई मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता समपातळीवर आणण्याचे आदेश देण्यात आले.
रेल्वे कामांचा घेतला सखोल आढावा
रेल्वे विभागाच्या आढाव्यात अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या सर्व टप्प्यांवरील कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. ३१ मे पर्यंत परळीपर्यंत रेल्वे ट्रॅक आणि जून महिन्यात रेल्वे चाचणी होणे अपेक्षित आहे.आष्टी स्थानकास वीज जोडणी, बीड-वडवणी, वडवणी-सिरसाळा व सिरसाळा-परळी या टप्प्यांतील सिव्हिल वर्क, भूसंपादन, अर्थवर्क व रुळ अंथरण्याच्या कामांबाबत माहिती घेण्यात आली. बीड-नगर-मुंबई व बीड-नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आष्टी, पाटोदा, शिरूर व बीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोड ओव्हर ब्रिज उभारण्याची गरज मांडण्यात आली असून, त्यासाठी प्रस्तावांची सद्यस्थिती विचारण्यात आली. बार्शीनाका येथे अतिरिक्त रेल्वे थांबा, पालवन व बार्शी नाका स्थानकांसाठी पार्किंग सुविधा, तसेच सर्व स्थानकांसाठी सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे निर्देश देण्यात आले. उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद नवीन रेल्वेमार्ग सर्वेक्षण, प्रकल्पाची व्यवहार्यता, तसेच प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला.
गंभिर मुद्दयावरही फोकस
विविध गावांमध्ये रेल्वेमुळे शेतीमाल वाहतुकीस अडथळे, पुलाखाली साचणारे पाणी, रस्त्यांचे अपूर्ण काम, लाईटची सुविधा नसणे, तसेच भूसंपादनातील अनियमितता व भ्रष्टाचाराबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. रायमोहा, शिरापूर, मोरजळवाडी, गोमळवाडा, विघ्नवाडी, नागरेचीवाडी आदी ठिकाणांतील स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
बीडमधील रस्त्यांच्या कामाबाबत अधिकारी फैलावर
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम अतिषय संत गतीने सुरू असल्यामुळे खा.बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. माझ्या बीडमधील लोकांना होत असलेला त्रास तात्काळ कमी केला नाही तर कोणाचीही गय करणार नाही, असा इशारा दिला.
०
घाटनांदूर रेल्वेथांब्यासाठी प्रस्ताव द्या
घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर विविध रेल्वेंना थांबा देणे आवश्यक असून त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वे थांबा देणेबाबत तातडीने केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी मी पाठपुरावा करेल, अशा सुचना खा.सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा