सर्व स्तरातून अभिनंदन....
न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना
अतिक्रमणे काढण्यात कोणताही भेदभाव होणार नाही ; सर्व नागरिकांना सारखाच न्याय - मुख्याधिकारी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
परळी वैजनाथ शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरी सुविधांमधील अडथळे दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.,अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी कायमस्वरूपी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अतिक्रमणे काढण्यात भेदभाव होणार नाही. सर्व नागरिकांना सारखाच न्याय दिला जाणार आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा आणि प्रामुख्याने नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने भेदभाव न करता सरसकट कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सातत्य राखण्यासाठी प्रशासनाने एक ‘कायमस्वरूपी अतिक्रमण निर्मूलन पथक’ स्थापन केले आहे. या पथकात नगर परिषदेचा अभियांत्रिकी विभाग, स्वच्छता विभाग आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाचेही सहकार्य घेतले जात आहे. हे पथक केवळ सध्याची अतिक्रमणे काढणार नाही, तर भविष्यात नवीन अतिक्रमणे होणार नाहीत याचीही नियमित पाहणी करणार आहे.
स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन...
नगर परिषद प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना आधीच पूर्वसूचना दिली असून, आपले अतिक्रमण स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेच्या वतीने कारवाई केली जाईल आणि त्या कारवाईचा खर्चही संबंधित अतिक्रमणधारकाकडूनच वसूल केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांनी आपल्या भागातील अतिक्रमणाबाबत काही तक्रारी किंवा सूचना असल्यास थेट नगर परिषदेच्या मुख्यालयी किंवा अतिक्रमण विभागाशी संपर्क साधावा. शहराच्या विकासासाठी परळीकरांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा