विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?
बीड जिल्ह्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका ; तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या!
खा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाला पत्र
बीड : बीड जिल्ह्यात १५ मे २०२६ पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेती पिके, फळबागा, कृषी संरचना आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी व ग्रामीण जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभेचे खा. बजरंग सोनवणे यांनी संवेदनशील भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र दिले आहे.
पत्रात म्हटले आहे, नुकसानग्रस्त भागाचे संयुक्त पथकांमार्फत युद्धपातळीवर पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. १५ मे पासून सुरू असलेल्या या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली उभी पिके, फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. याशिवाय, चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे शेतातील ठिबक सिंचन संच, पाइपलाइन, महागडे शेडनेट, मोटार पंप, विद्युत जोडण्या आणि इतर कृषी उपकरणांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेला बीडचा बळीराजा संपूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला आहे.
घरे, गोठे जमीनदोस्त; दुर्दैवी घटनांमध्ये जनावरे दगावली
केवळ शेतीच नव्हे, तर ग्रामीण भागातील जनजीवनालाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांची घरे, गुरांचे गोठे आणि निवारे कोसळले आहेत. अनेक भागांत झाडे आणि भिंती अंगावर पडल्याने मुख्य पाळीव जनावरे दगावल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे.
विद्युत पुरवठा खंडित; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत विद्युत खांब आणि वीज तारा उन्मळून पडल्या आहेत. परिणामी, शेकडो गावांतील वीज पुरवठा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि दैनंदिन कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे व चिंतेचे वातावरण आहे.
संयुक्त पथकांमार्फत तात्काळ पंचनाम्यांचे आदेश द्यावेत!
खा.सोनवणे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण नागरिक अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना शासनाच्या तातडीच्या मदतीची नितांत गरज आहे. यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि महावितरण यांच्या संयुक्त पथकांमार्फत तात्काळ सर्व नुकसानग्रस्त भागाचे संयुक्त सर्वेक्षण (Joint Survey) करून अचूक पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत. तसेच, पीडित शेतकरी व नागरिकांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत मंजूर करून आवश्यक ते प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावेत, अशी आग्रही मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा