१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा
ठोस आश्वासनाने रस्ते नुतनीकरण प्रश्न मिटला
कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासनाने आंदोलन तूर्तास स्थगित
परळी / प्रतिनिधी
अंबाजोगाई - मोहा - सिरसाळा व परळी - नागापूर - बोधेगाव - मोहा - सर्फराजपूर या दोन रस्त्यांचे तात्काळ अद्यवतीकरण करा या मागणीसाठी भारताच्या लोकशाहीवादी युवक संघटनेने रखरखत्या उन्हात म्हतारगाव फाटा कान्नापूर या ठिकाणी मागील पाच दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनास पाठींबा म्हणून या खराब मार्गाने बाधित गावकऱ्यांनी टायर जाळून बांधकाम विभागाचा निषेध केला. आंदोलनाची तीव्रता पाहता विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी, उपअभियंता मुंडे यांनी सोमवार दि 20 रोजी आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. सुमारे दीड तास आश्वासक चर्चेअंती हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
परळी तालुक्यातील मोहा गावाला अंबाजोगाई आणि परळी या दोन्ही तालुक्याला जोडणा-या राज्य महामार्गाची अतिवृष्टीमुळे चाळणी होऊन या मार्गावरील पूल देखील खचले गेले आहेत. आरोग्य, शिक्षण, व्यापार आदी विविध कारणाने या मार्गावरुन हजारो नागरिकांची वर्दळ असताना जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागत आहे.
कार्य आदेश पारित होऊन देखील काम झाले नसल्याने या मार्गावरील युवकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला.राज्य मार्ग 211 व राज्य मार्ग 486 या दोन्ही मार्गाला जोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक म्हतारगाव फाटा कांनापूर ता-धारूर या ठिकाणी रखरखत्या उन्हात गुरुवार दि 16 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत उपअभियंता मुंडे, परळीचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी भेटी दिल्या मात्र ठोस आश्वासन दिले नसल्याने आंदोलन सुरूच राहिले. या आंदोलनासाठी या राज्य मार्गामुळे वाघाळा, नागापूर, मांडेखेल, बोधेगाव, म्हतारगाव, कांनापूर, मोहा, वंजारवाडी, सरफराजपूर, गर्देवाडी आदी बाधित गावकऱ्यांनी रस्त्यावर एकत्र येत टायर जाळून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान आंदोलनाची व्याप्ती पाहता विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी, उपअभियंता मुंडे यांनी भेट देऊन सिरसाळा-मोहा रस्त्याची 8 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल व परळी-नागापूर मार्ग नुतनीकरण निविदा पुनरप्रकाशीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. या भेटी दरम्यान ऑड.अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, सुदाम शिंदे, भागवत देशमुख, विशाल देशमुख, प्रवीण देशमुख, विष्णुपंत देशमुख, विजय घुगे, सिद्राम सोळंके, प्रशांत मस्के, इस्माईल शेख, सुशील देशमुख, करेवाडीचे सरपंच लक्ष्मण कावळे, कांनापूरचे सरपंच गोपाळ कुकडे, कावळेवाडीचे सरपंच जगन्नाथ कावळे यांच्यासह परिसरातील गावातील शेकडो युवक, नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा