१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा
व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन सर्वांना सारखा न्याय देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
परळी नगर परिषदेच्या वतीने शहरात सध्या राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपातीपणा करू नये. रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे भाविक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण कोणत्याही भेदाभेदाशिवाय सरसकट काढण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केलीआहे. व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन, सर्वांना सारखा न्याय देऊन ही मोहीम राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी आज मोंढा परिसरात जाऊन स्थानिक व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि नगर परिषदेच्या मोहिमेची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या. या भेटीनंतर बोलताना देशमुख म्हणाले की, परळी हे ज्योतिर्लिंग वैजनाथाचे पावन क्षेत्र असल्याने येथे देशभरातून भाविक येतात. मात्र, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे या भाविकांना आणि स्थानिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. नगर परिषदेने ही मोहीम राबवताना कुणाचे हित न पाहता रस्ते मोकळे करावेत. मात्र रस्त्यावरील आणि फूटपाथवरील अतिक्रमण काढताना गरिबांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मोठ्यांचे अतिक्रमण काढताना नगर परिषद नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रशासनाने आधी पार्किंगची योग्य व्यवस्था करावी आणि फूटपाथवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच अतिक्रमण सीमा निश्चित करून खुणा कराव्यात. तोंड बघून अतिक्रमण न काढता व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे. याबाबत दीपक देशमुख यांनी नगरसेवक नितीन बागवाले, व्यंकटेश शिंदे, शिवसेना शहराध्यक्ष वैजनाथ माने, वैजनाथ जोशी, गोविंद माने आदींसह न. प. उपमुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा