MB NEWS- "आधुनिक विज्ञानाचे मूळस्रोत संस्कृत भाषेत ! " संस्कृत दिन समारंभात श्री वसंतराव देशमुख यांचे विचार--
"आधुनिक विज्ञानाचे मूळस्रोत संस्कृत भाषेत ! "
संस्कृत दिन समारंभात श्री वसंतराव देशमुख यांचे विचार
परळी वैजनाथ दि.१२----
जगाच्या पाठीवर संस्कृत ही दिव्योत्तम अशी सर्वश्रेष्ठ भाषा अखिल मानवांचे कल्याण साधणारी असून आधुनिक युगात विज्ञानाचे जे नवनवीन शोध लागत आहे, त्याचे मूळस्रोत संस्कृतभाषेत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्री वसंतराव देशमुख यांनी केले.
येथील आर्य समाजात काल (दि.११) सामूहिक स्वरूपात "संस्कृत-दिन" साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे सचिव श्री उग्रसेन राठौर हे होते. यावेळी व्यासपीठावर वैदिक विद्वान पं. रामनिवास गुणग्राहक, पं.उदयवीर आर्य ,श्री सोममुनी, आचार्य सत्येंद्र, जुगलकिशोर लोहिया आदींची उपस्थिती होती.
श्री देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आधुनिक युगात संस्कृतभाषेचा अभ्यासाचा अभाव होत चालल्याने आपण शाश्वत सुखापासून दुरावत चाललो आहोत, याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले- संस्कृतच्या अभ्यासाने माणूस शहाणा होतो व त्याबरोबर व्यवहाराचे ज्ञान देखील प्राप्त करतो. यासाठीच विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सर्वदृष्ट्या उन्नत होण्याकरिता संस्कृत भाषेतील ज्ञान-विज्ञानाचा व नैतिक मूल्यांचा अंगीकार करावा .
पं.श्री रामनिवास गुणग्राहक यांनी आपल्या भाषणात संस्कृत ही भाषा आपल्यातील गुणवैशिष्ट्यांमुळे सर्व भाषांपेक्षा सरस असल्यामुळे आधुनिक वैज्ञानिक युगात तंत्रज्ञान व आत्मज्ञानाच्या निकोप वाढीसाठी अतिशय सर्वोत्तम आहे. म्हणूनच या भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर श्री उदयवीर आर्य यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीचे महत्व विशद करणारे गीत सादर केले.
------ पुरस्कार वितरण सोहळा------
दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या संस्कृत श्लोकगायन व भाषणस्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याच कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या दोन्ही स्पर्धेत शहरातील विविध शाळा - महाविद्यालयांच्या जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दिवंगत श्री नंदलालजी लाहोटी यांच्या स्मरणार्थ लाहोटी परिवाराच्या वतीने पुरस्कार व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डा.वीरेंद्र शास्त्री यांनी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण चव्हाण, अतुल नरवाडकर यांनी केले, तर आभार रंगनाथ तिवार यांनी मानले. या कार्यक्रमास सर्वश्री लक्ष्मीनारायण लाहोटी, गोवर्धन चाटे, लक्ष्मणराव आर्य, प्रा.डा. नयनकुमार आचार्य, रमाकांत निर्मळे आदी मान्यवरांसह शिक्षक पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा