संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार
महिलांच्या एकोपा व सामाजिक सौहार्दाचे प्रतीक ठरले संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू
परळी (प्रतिनिधी):
संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त महिलांमधील स्नेह, समरसता आणि सामाजिक भावना अधिक दृढ व्हाव्यात या उद्देशाने कुलकर्णी, केंद्रे, वारद व नव्हाडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. परळी येथील गणेशपार भागात पत्रकार अनंत कुलकर्णी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी परंपरेनुसार एकत्र येत सामाजिक नातेबंध अधिक घट्ट करण्याचा संकल्प या कुटुंबियांनी जपला आहे. यंदाही कुलकर्णी, नव्हाडे, केंद्रे व वारद परिवारांनी एकत्र येत संक्रांतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबवला. कार्यक्रमाला शहरातील विविध भागांतील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. हळदीकुंकू हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक विधी न राहता महिलांच्या मनातील आनंद, सौहार्द आणि आपुलकी व्यक्त करणारा सामाजिक सोहळा ठरला.
या प्रसंगी परळी शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी विशेष भेट देत महिलांशी संवाद साधला. त्यांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत महिलांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय राहावे, असे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक अधिष्ठान लाभले.
कार्यक्रमात शीतल कुलकर्णी, भाग्यश्री, सरिता वारद, ज्योती नव्हाडे व शिवानी वारद यांनी उपस्थित महिलांचे मनःपूर्वक स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू लावून वाण देण्यात आले. महिलांनी एकमेकांना शुभेच्छा देत संक्रांतीचा आनंद साजरा केला.
हा हळदीकुंकू कार्यक्रम महिलांच्या एकोपा, सामाजिक भावना आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणारा ठरला. अशा उपक्रमांतून समाजात आपुलकी, सहकार्य आणि सकारात्मकतेची भावना वृद्धिंगत होत असल्याचे चित्र दिसून आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा