MB NEWS-●जोशींची तासिका●नैतिकता, संस्कृतीच्या बुरख्याखालचा राजकीय गेम..!
नैतिकता, संस्कृतीच्या बुरख्या खालचा राजकीय गेम..!
●जोशींची तासिका
रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वमध्ये भाजपने उमेदवारी जाहीर करून, अर्ज भरून त्यांचे उमेदवार मुरजी पटेलांना अर्ज वापस घ्यायला लावला हे आता काही तासांत जुने झाले आहे. तो अर्ज वापस घेताना भाजपने नैतिकता, संस्कृती, प्रथा असे जड शब्द वापरले आहेत. ज्यात मुळीच तथ्य नाही.
उद्धव ठाकरेंना नामोहरम करायचे असेल तर त्यांच्याकडील शिवसेना पक्षाचे नावं, चिन्हाला धक्का लावणे आणि सध्या प्रशासक असलेली मुंबई मनपा ताब्यात घेणे हे मोठे टार्गेटस अचिव्ह करणे भाजपला क्रमप्राप्त आहे.या पोटनिवडणुकीत अधिकृत शिवसेना नावं आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवून भाजपने आपले पहिले टार्गेट पूर्ण केले.
त्यानंतर या निवडणुकीत ज्या पद्धतीने राज ठाकरेंना पुढे करून मुंबईत पॉवर सेंटर मातोश्री नाही तर शिवतीर्थ असेल असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. १५ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जातात. मग १६ ऑक्टोबर रोजी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतात. नंतर राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस यांना "प्रिय मित्र" म्हणत पोटनिवडणुकीतून भाजपने उमेदवार वापसीचे आवाहन करतात.
लगोलग संध्याकाळी शरद पवारही पत्रकार परिषद घेऊन तसेच आवाहन भाजपला करतात. लगेच सूत्र हलतात आणि उमेदवारी अर्ज वापस घ्यायची मुदत संपायच्या काही तास आधी १७ ऑक्टोबर रोजी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज वापस घेतात. दरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत राज ठाकरेंची भेट घ्यायला शिवतीर्थ येथे पोहचतात. लगोलग राज ठाकरे आभार पत्र लिहितात. हे सगळे एका ठराविक स्क्रिप्टनुसार झाल्यासारखे आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ देणाऱ्या आमदारांत मुंबई बाहेरील आमदार, खासदारांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईत सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, राहुल शेवाळे असे मोजके चेहरे त्यांच्या सोबत आहेत. गेल्या तीस वर्षांत मराठी माणसाने ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिली ती उल्लेखनीय आहे. मात्र, त्यांच्या पश्चात झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपने सेनेची जवळपास बरोबरी केली आहे.
राज ठाकरे यांच्यात सातत्य नाही. पण, त्यांच्या भाषणाचा प्रभाव मराठी जनमानसात आहे. त्यामुळे राज ठाकरे हे मुंबईतील उद्धव ठाकरेंच्यासोबत राजकीय अभिलाषेपोटी असलेल्या लोकांना आपलेसे करू शकतात. त्यासाठी त्यांच्या शब्दाला राज्यकर्त्यांच्या आणि विरोधकांच्या लेखी किती महत्त्व आहे हे रंगवण्याचा प्रयत्न झाला.
कारण, हे बिनविरोधचे तुणतुणे वाजवायचे असते तर राज ठाकरेंनी पत्र लिहिल्यानंतर काही तासांत शरद पवारांनी पत्रकार परिषद घेण्याचा मुहूर्त शोधला नसता. त्यापूर्वी शरद पवार आवाहन करून मोकळे झाले असते. थोडक्यात इथे राज ठाकरेंची सत्ताधारी आणि विरोधी वर्तुळात असलेली इमेज मोठी करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला गेला हे स्पष्ट आहे.
सोबतच नाना पटोले म्हणतात तसे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची पार्श्वभूमीही आहेच. आशिष शेलार यांना अध्यक्ष पदाचे डोहाळे लागले आहेत जे शरद पवारांनी साथ दिली तर सहज पूर्ण होऊ शकतात.
यात अजून एक अँगल म्हणजे माध्यमांतील बुडबुडे. आठवून बघा उत्तर प्रदेशात २०१७ साली भाजपने भरघोस यश मिळवून सव्वा तीनशेच्या आसपास आमदार निवडून आणले होते. त्यांनंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या जागी गोरखपूर आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या जागी फुलपूर लोकसभेच्या जागा विरोधकांनी भाजपला हरवून जिंकल्या होत्या. त्यानंतर माध्यमांनी परतीचा पाऊस, मोदी लाट ओसरली, राहुल गांधींना 'सहानुभूती', पोषक वातावरण वगैरे वगैरे नरेटिव्ह मीडियात सेट केले गेले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुका एक वर्षांवर होत्या. तोपर्यंत प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत माध्यमांनी अर्थात तथाकथित ल्युटेंस मीडियाने भाजपला धोका, भाजपमध्ये अस्वस्थता असे चित्र रंगवून विरोधी पक्ष्यांच्या फुग्यात शक्य तेवढी हवा भरली. शेवटी व्हायचे तेच झाले मोदींच्या भाजपने २०१४ पेक्षा २०१९ मध्ये स्वबळावर तीनशेहून अधिक जागा घेऊन सत्ता पुन्हा स्थापन केली.
आताही बघत रहा. माध्यम आणि त्यांचे प्रतिनिधी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आदी माध्यमातून महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांनी धसका घेतलाय, त्यांच्यात अस्वस्थता आहे असे वेगवेगळे नरेटिव्ह सेट करत राहतील. बाकी, प्रत्यक्ष निकाल लागल्यावर शिव्या खायला इव्हीएम तर आहेच.
जय हिंद,
✍️अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
दि. १७ ऑक्टोबर २०२२
-------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा