राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*

मल्टीस्टेट व पतसंस्थांच्या नाहक चर्चांनी अस्वस्थता: पण हीच ती वेळ एकमेकांना जपण्याची

#जोशींचीतासिका

सध्या सर्वत्र अफवांचा बाजार पिकलेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे षड्यंत्र कार्यरत झाले आहे. याचे फटके संबंधित मल्टिस्टेट किंवा पतसंस्थाना बसत आहेतच पण सोबतच ठेवीदार अस्वस्थ झालेत हे सारे झाले आहे फक्त अफवांमुळे.

अफवा किंवा कम्युनिकेशन गॅप काय अनर्थ घडवू शकतो याचे प्रात्यक्षिक मी पहिल्यांदा अनुभवले ते अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात प्रशिक्षण घेत असताना. बहुधा मे १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे यशस्वी अणू चाचणी केली होती. तेव्हा आमच्या वर्गात जवळपास तीनशे प्रशिक्षणार्थी बसलेले असताना. आमच्या प्रशिक्षकांनी एक प्रयोग केला. त्यात त्यांनी एक विद्यार्थ्याच्या कानात काहीतरी सांगितले, त्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते दुसऱ्याच्या कानात सांगितले. त्यानंतर असेच करत करत शेवटच्या विद्यार्थ्याने जे ऐकले ते वर्गाला ऐकवयायचे होते. 

त्यात प्रयोगात शेवटच्या विद्यार्थ्याने आम्हांला जे ऐकवले ते काहीसे असे होते की 'अटलने जयला पत्र लिहिले' मुळात पहिल्या विद्यार्थ्याला सांगितले गेलेले वाक्य होते की 'अटल बिहारी वाजपेयींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान असा नारा दिला'. थोडक्यात एकाच ठिकाणी उपस्थित असून एकजण दुसऱ्याला सांगताना मोठा विपर्यास होऊ शकतो.

इथे तर कोणतीही आर्थिक संस्था, तिचे संचालक, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक आणि ज्यांचा संस्थेशी दुरान्वये संबंध नाही अशा लाखो करोडो लोकांमध्ये अर्थाचा काय अनर्थ काढला जात असावा.

बीडच्या ज्ञानराधाच्या अफवे नंतर परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ही क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाबत अशीच अफवा शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी पसरवली गेली. आता हे लक्षात घ्या हुशारीने शुक्रवार निवडला गेला असणार जेणेकरून शनिवार, रविवारी बँकेला सुट्टी त्यांनंतर सोमवार २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक जयंती असल्याने बँकांना सुट्टी होती. या तीन दिवसांत अफवा वाऱ्यासारखी पसरली. नको त्या चर्चांना उधाण आल्याने सामान्य ग्राहक वर्ग अस्वस्थ होणे स्वाभाविक होते.

त्यानंतर बोटावर मोजता येईल इतक्या अतिउत्साही लोकांनी मल्टिस्टेटच्या काही शाखांत जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो इतर सुजाण ग्राहकांनीच उधळून लावला. यासाठी परळीकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

आता थोड्याश्या तांत्रिक बाबी समजून घेवू; कोणतीही बँक ही तिच्या ठेवींच्या सत्तर टक्के रक्कम कर्ज देऊ शकते. काही रक्कम बँक स्थावर मालमत्ता किंवा इतर आर्थिक संस्थांत गुंतवणूक केली जाते. राजस्थानी मल्टिस्टेटने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ठेवी जवळपास २८३ कोटींच्या आहेत तर सुमारे २२९ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. गुंतवणूक आहे २८.३० कोटींची तर तर संस्थेच्या स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य अंदाजे १५१ कोटी आहे.

आता कल्पना करा की अफवा पसरल्यावर जर अचानकपणे ठेवीदारांची झुंबड उडाली तर काय होईल? कोणतीतरी आर्थिक संस्था सर्वांना एकरकमी रक्कम एकाच दिवसांत कशी देऊ शकेल? इथे राष्ट्रीयकृत बँका असो किंवा दस्तुरखुद्द आर.बी.आय. त्यांना हे शक्य नाही. जसे काही ठेवीदार मुदतपूर्व ठेवींच्या संपूर्ण रक्कम मागत आहेत तसे कर्जदार बँकेला एकाचवेळी मुदतपूर्व कर्ज परत करू शकतील का? तसेच बँकही त्यांच्या कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज कसे वसूल करू शकेल? याचाही विचार व्हायला हवा. बँकिंग व्यवस्थेत विश्वास महत्त्वाचा आहे तो संस्था आणि ग्राहक दोघांनी जपला तरच गणित चपखल बसते अन्यथा विघ्नसंतोषी लोकांचे फावते.

संस्थाचालक चंदूलाल बियाणी यांचे वकीलपत्र घेऊन मी आज लिहीत नाहीये. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे शहराच्या विकासातील निर्विवाद योगदान सर्वश्रुत आहे. मुळात ज्याचा पैसा आहे त्याची भीती रास्त आहे पण एका फुटकळ अफवेवर विश्वास ठेवाल संस्था आणि तुम्हीही अडचणीत याल. आज राजस्थानी मल्टिस्टेटच्या अफवेनंतर शहरातील काही लहान मोठ्या पतसंस्थांना त्याचा फटका बसयला सुरुवात झाली आहे. यामुळे परळी वैजनाथ शहराचे अर्थचक्र अडचणीत येण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. आगामी काळात खाजगी सावकारी बोकाळली तर लोकं देशोधडीला लागतील. आपण नेहमीप्रमाणे एकमेकांना साथ देणे अत्यावश्यक आहे. जर शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील आर्थिक संस्था टिकल्या तर सामान्य वर्ग जगेल.

याआधीही परळीकरांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत त्यात कोणीही राजकीय हेतूने सामील झाले नाही. उदाहरणार्थ शहरात राबविलेली वृक्षसंवर्धन चळवळ, भारनियमन मुक्ती, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, केरळला नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेली मदत फेरी, परळी अंबाजोगाई रस्त्यासाठी घेतलेली सामूहिक भूमिका, कु. सानवी चौंडेला दुर्धर आजारात मदत करण्यासाठी केलेली मदत फेरी (यातून तिच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू झाले आहेत) असे अनेक उपक्रम सांगता येतील ज्यात परळीकर जात, धर्म, पंथ न पाहता एकमेकांच्या मदतीसाठी हिरीरीने पुढे सरसावतो.

आता पुन्हा एकदा वेळ आली आहे आपण सर्वांनी Collective Efforts घेऊन राजस्थानी मल्टिस्टेटसह शहरातील इतर आर्थिक संस्थांना आधार द्यायची. मला खात्री आहे प्रभू वैद्यनाथाच्या आशिर्वादाने सर्व काही लवकर सुरळीत होईल.

*राजस्थानी मल्टिस्टेटसह इतर संबंधित पतसंस्थांना आवाहन*
१. तुमच्या प्रत्येक शाखेबाहेर तुमच्या संस्थेचा आर्थिक ताळेबंदाचे होर्डिंग्ज लावणे.
२. होर्डिंग्जवर सर्व संचालकांचे नावं, चालू मोबाईल नंबर देणे जेणेकरून ग्राहकांना वेळीच शंकानिरसन करून घेता येईल.
३. तज्ज्ञ लीगल एडव्हायझर बोर्ड नेमून त्यांचीही नावं, मोबाईल नंबरसह माहिती देणे
४. अफवा पसरवणाऱ्या ज्ञात / अज्ञात लोकांविरुद्ध रीतसर पोलीस तक्रार करणे.


जय हिंद,
अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
दि. ३ डिसेंबर २०२३



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !