ब्राह्मण सभेच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिर उर्वरित विकास कामांसाठी २० लक्ष रु.निधी - ना.पंकजाताई मुंडे
■ परळीत ब्राह्मण सभा आयोजित शानदार सोहळ्यात २० बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !
सात्विक समाज निर्मितीसाठी धर्मसंस्कार हाच जीवनाचा पाया : ना.पंकजाताई मुंडे
अविरत ४५ वर्षांचा ब्राह्मण सभेचा उपक्रम कौतुकास्पद- आ.धनंजय मुंडे
धर्माचरण व नैष्ठिक आचारासाठी उपनयन संस्कार- प.पु.मकरंद महाराज
धर्मशील समाज निर्मितीसाठी उपनयन संस्कार - भागवतमर्मज्ञ ह. भ.प. बाळुमहाराज उखळीकर
परळी वै.(प्रतिनिधी)-
धर्माचरणाचे संस्कार हे उपनयनासारख्या संस्कारातून होतात. धर्माचरण व नैष्ठिक आचारासाठी उपनयन संस्कार गरजेचा असल्याचे प.पु.मकरंद महाराज यांनी सांगितले. धर्मशील समाज निर्मितीसाठी उपनयन संस्कार आवश्यक असल्याचे भागवतमर्मज्ञ ह. भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांनी सांगितले. तसेच धर्मसंस्कार हाच जीवनाचा पाया असतो असे ना.पंकजाताई मुंडे यांनी तर परळीत अविरत ४५ वर्षांचा ब्राह्मण सभेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आ.धनंजय मुंडे यांनी सांगितले.ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित शानदार सोहळ्यात विविध ठिकाणच्या २० बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले.
ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २ मे रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात विविध ठिकाणच्या २० बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. सकाळी १०.३० वा. प्रवचनमंडप वैद्यनाथ मंदिर परळी वै. येथे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात व विधीपुर्वक हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे पौरोहित्य मनोहर देव जोशी व ब्रह्मवृंदांनी केले.या वेळी दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पु. मकरंद महाराज, प्रसिद्ध भागवताचार्य, कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे अशिर्वचन झाले. या सोहळ्यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे ,आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संत -महंत, विद्वतजन, राजकीय - सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती लाभली.
धर्मसंस्कार जीवनाचा पाया असुन हे संस्कार करणारा ब्राह्मण सभेचा उपक्रम अविरत ४५ वर्षांपासुन सुरु ठेवणे हे कौतुकास्पद असुन परळीतील सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याच्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या या परंपरेत मला उपस्थित राहता आले हे आनंददायी असल्याची भावना ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.तर या उपक्रमाला आपण अनेक वर्षापासून दरवर्षी उपस्थित राहत असतो. ब्राह्मण समाज हा आशिर्वाद प्रदान करणारा असुन उपनयन संस्कार सोहळ्याचा अविरत ४५ वर्षापासूनचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आ.धनंजय मुंडे यांनी सांगितले.
हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.सकाळी मातृका पुजनानंतर सर्व बटूंची प्रभू वैद्यनाथ मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात आली. सनई चौघडा, मंत्रोच्चार व समाज बांधवांची मोठी उपस्थिती यामुळे मंदिर परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य शंकराचार्य जयंती साजरी करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आद्य शंकराचार्य यांचे पूजन करण्यात आले.ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र जोशी,अजय जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र नव्हाडे यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
● ब्राह्मण सभेच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिर उर्वरित विकास कामांसाठी २० लक्ष रु.निधी - ना.पंकजाताई मुंडे
दरम्यान या सोहळ्याच्या अनुषंगाने मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.परळी वैजनाथ येथे ब्राह्मण बहुउद्देशीय सभेच्या वतीने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मीणी मंदिर व स्व. मनोहरपंत बडवे सभागहाच्या उर्वरित विविध विकास कामांसाठी आमदार निधीतून २० लक्ष रु.निधी देण्याची घोषणा ना.पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा