आता राज्यातील ४ लाख ऊसतोड कामगारांना होणार गृहोपयोगी वस्तू संचांचे वाटप ;शासन निर्णय निर्गमित
बीड जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 25 कोटींच्या भांड्यांचे होणार वितरण
परळीवैजनाथ, प्रतिनिधी.....
राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांचे कुटूंबियांना गळीत हंगामाच्या कालावधीमध्ये अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ऊसतोड कामगारांना "गृहोपयोगी वस्तू संच" वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्याबाबत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ४ लाख लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तु संच वाटप करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे या मध्ये सर्वाधिक लाभार्थी संख्या बीड जिल्ह्यात 25 हजार इतकी असून तब्बल 25 कोटी रुपयांच्या भांड्यांचे बीड जिल्ह्यात वितरण होणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सद्यः स्थितीमध्ये राज्यात कार्यरत सहकार व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये उसतोड कामगार काम करतात. बहुतांश उसतोड कामगार हे राज्यातील विविध जिल्ह्यांत स्थलांतरीत होऊन काम करतात. या उसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटूंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी व्यवसायातील उसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी दिनांक १३ सप्टेंबर, २०१९ अन्वये गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.ऊसतोड कामगार व त्यांचे कुटूंबिय दरवर्षी गळित हंगामाच्या कालावधीमध्ये ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये रिकाम्या शेतामध्ये ऊसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपड्यांमध्ये त्यांचे वास्तव्य असते. या कालावधीमध्ये त्यांच्या मूळ गावावरून फारच त्रोटक / अपुरे साहित्य घेऊन येत असतात. ऊसतोड कामगारांकडे पुरेसे गृहोपयोगी साहित्य (स्वयंपाकाची भांडी) यांची कमतरता असल्यामुळे ऊसतोड कामगारांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरीत करण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता आजच्या शासन निर्णयातून देण्यात आली आहे.तथापि, प्रथम टप्प्यामध्ये १ लाख लाभार्थ्यांना व उर्वरित लाभार्थी संख्येनुसार टप्प्याटप्प्याने सदर गृहोपयोगी वस्तू संच वेळोवेळी शासन मान्यतेनुसारच वाटप करण्यात येईल.
गृहउपयोगी संचामध्ये असणार 30 वस्तू...
ताटं ०४, वाटया ०८,पाण्याचे ग्लास०४, पातेले झाकणासह (लहान) ०१, पातेले झाकणासह (मध्यम) ०१,पातेले झाकणासह (मोठे) ०१, मोठा चमचा (भात वाटपाकरीता) 09, मोठा चमचा (वरण/भाजी वाटपाकरीता) ०१, पाण्याचा जग (०२ लिटर) १०, मसाला डब्बा ०१,डब्बा झाकणासह (१४ इंच) ०१, डब्बा झाकणासह (१६ इंच) ०१,डब्बा झाकणासह (१८ इंच) ०१, परात ०१, प्रेशर कुकर (०५ लिटर) स्टेनलेस स्टील ०१, कढई (स्टील), स्टीलची टाकी मोठी झाकणासह वगराळासह ०१ असे एकूण ३० भांडे समाविष्ट असलेला संच वितरीत करण्यात येणार आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय असे आहेत लाभार्थी....
दरम्यान गृह उपयोगी वस्तू संच पुरविण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक लाख लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक लाभार्थी संख्या ही बीड जिल्ह्यात २५००० इतकी आहे तर सर्वात कमी लाभार्थी संख्या परभणी व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी ५000 इतकी आहे. दहा जिल्हे व राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील ऊसतोड कामगार लाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार गृहपयोगी वस्तू संच टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यात लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे: बीड २५००० नाशिक ११४०० लातूर ५००० धाराशिव १०,१०० छत्रपती संभाजी नगर १०,००० नांदेड ५००० जळगाव १३४०० जालना ८४०० अहिल्यानगर ६७०० परभणी ५०००.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा