ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढत चाललेल्या समाज माध्यमांचे हिंसक व्यसन व आक्रमकतेबाबत चिंता ....
समाज माध्यमातील 'स्टेटस्' आणि ‘स्टोरी’वरून वाद: तरुणाचा खून, दोघे गंभीर
बीड, प्रतिनिधी : समाज माध्यमांवर एकमेकांविरोधात टाकलेल्या ‘स्टोरी’च्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद सोमवारी रात्री भीषण हाणामारीत परिवर्तित झाला. कड्याजवळील रुईनालकोल (ता. आष्टी) येथे झालेल्या या घटनेत २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुईनालकोल (ता. आष्टी) गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर एकमेकांविरोधात टाकलेल्या ‘स्टेटस’ आणि ‘स्टोरी’वरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांत वाद सुरू होता. हा वाद प्रत्यक्षात भिडल्याने परिस्थिती चिघळली.वाद वाढताच एका गटातील तरुणांनी धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०) हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.याच हल्ल्यातील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. या प्रकरणी गुन्हा हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. समाज माध्यमांवरील किरकोळ वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढत चाललेल्या समाज माध्यमांचे हिंसक व्यसन व आक्रमकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा