संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम
'अंकुर मानवतेचा' बालनाट्यातील बालकलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने
छत्रपती संभाजीनगर:प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत, सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (गुंज) संचलित आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कुं. पिंपळगाव च्या बालचमूंनी आपल्या दमदार अभिनयाने रंगमंच गाजवला.छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे.
लेखक हरिदास घुंगासे यांच्या लेखणीतून उतरलेले हे नाटक मोबाईलच्या आभासी जगात हरवलेली मुले आणि कचरा वेचून जगणाऱ्या अनाथ मुलाची जगण्याची जिद्द यातील संघर्ष प्रभावीपणे मांडते. मानवतेचा खरा अंकुर कसा फुलतो, याचे वास्तववादी दर्शन या नाटकातून घडले. दिग्दर्शक नंदू वाघमारे यांच्या कल्पकतेने विराज दायमा, कार्तिक बहिरे, आयुष घुंगासे, आदिती खडके, ईश्वरी ताठे, दर्शना डोईफोडे आणि तनवी सोळंके या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
नाटकाच्या यशात तांत्रिक बाजू सांभाळणारे रघुनाथ ताठे, सीमा ताठे तसेच मनीषा घुंगासे, किसन भोईटे, पवन दशरथ, काजल बल्लय्या आणि सपना बलैया यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील या कलाकारांना राज्य स्तरावर मोठी झेप घेता आली.जालना जिल्ह्याच्या आणि कुं. पिंपळगावच्या या छोट्या सुपरस्टार्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.रंगकर्मी डॉ.राजू सोनवणे आणि सिनेनाट्य लेखक दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी बालकलावंतांना मार्गदर्शन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा