एक्सपोच्या माध्यमातून पशुपालकांच्या उन्नतीसाठी काम करता आले याचा आनंद जास्त
परळीतील महापशुधन एक्सपो विक्रमी प्रतिसादाने यशस्वी ; उत्कृष्ट पशुपालकांना ना. पंकजाताई मुंडेंच्या हस्ते पुरस्कार
एक्सपोच्या माध्यमातून पशुपालकांच्या उन्नतीसाठी काम करता आले याचा आनंद जास्त
विविध गटातील ८२ पशूपालकांना एक कोटी ७० लाखाची बक्षिसे ; एक्सपोसाठी मेहनत घेणाऱ्यांना केले सन्मानित
पशुपालकांची मेहनत, अनुभव व ज्ञानाचा उपयोग करून पशुसंवर्धन विभाग प्रभावीपणे काम करणार -ना.पंकजाताई मुंडे
परळी वैजनाथ दि. १५...
माझ्या पशुसंवर्धन विभागाने देश पातळीवरील महा पशुधन एक्सपो अतिशय सुयोग्य पद्धतीने नियोजित करून तो यशस्वी केला आहे. या महा पशुधन एक्सपोमध्ये राज्य व राज्याबाहेरील पशुपालकांनी सहभागी होत आपले नवनवीन प्रयोग, पशुंची वाढ व विकास, आपले अनुभव आणि ज्ञान या ठिकाणी प्रदर्शित केले. यातून अनेकांनी माहिती घेत आत्मविश्वासाने पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात उतरण्याचा निश्चय केला आहे. पशुपालकांच्या या मेहनत, अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम व उद्योगांमध्ये करून प्रभावीपणे काम करणार असल्याची ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली. एक्सपोच्या माध्यमातून पशूपालकांच्या उन्नतीसाठी काम करता आले याचा सर्वाधिक आनंद होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
13 ते 15 फेब्रुवारी यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या देशपातळीवरील महापशुधन एक्सपोचा आज थाटात समारोप झाला. याप्रसंगी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध गटाच्या स्पर्धांमधील ८२ पशुपालक विजेत्यांना ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते तब्बल एक कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली. स्मृतीचिन्ह, पदक व रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप होते. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त प्रवीण कुमार देवरे, डाॅ मुकणे, पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी परळीतील महा पशुधन एक्सपो अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करून उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. राज्य आणि राज्याबाहेरील पशुपालकांनी तसेच नागरिकांनी सहकुटुंब येऊन या महा एक्स्पोला यशस्वी करण्यासाठी विक्रमी प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
सर्व सामान्यांसाठी असेच काम करत राहू
माझा कार्यक्रम असला की लोक काय आहे हे विचारत नाहीत. नेहमीच अशा प्रकारचं प्रेम जनता आपल्यावर करते. पंकजाताई काहीतरी करत आहेत एवढं कळालं तरी लोक माझे कौतुक करण्यासाठी येतात. मी बोलावलं म्हणल्यानंतर त्याचे काय ध्येय आहे याचा विचार न करता लोक येत असतात ही खूप मोठी कमाई आहे. विविध जिल्ह्यातील लोक आजही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या सर्वांच्या कल्याणाचा आणि सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाचा हाती घेतलेला हा वसा असाच पुढे चालू ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली.
नैसर्गिक शेती आणि पशुपालनाकडे कल वाढवा
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपल्याकडे नैसर्गिक शेती पूर्वापार चालत आलेली आहे. यातच सुदृढ, समृद्ध आणि निरामय आरोग्याचे गुपित दडलेले आहे. नैसर्गिक शेती आणि पशुपालनातून ही बाब आणखी वाढली पाहिजे या दृष्टीने पशुसंवर्धन विभाग वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबवत आहे. पशुसंवर्धनातून रोजगार निर्मिती, दुग्ध व्यवसाय आणि आता मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना आपण राबवणार आहोत. परळीतील महापशुधन एक्सपोतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. मी पण आता शेतीकडे लक्ष देणार आहे. प्रत्येकाने पशुपालन आणि नैसर्गिक शेती यात उतरले पाहिजे असे आवाहन ना पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.
पशुपालकांच्या ज्ञानाचा उपयोग योजना राबविण्यासाठी करणार
पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला वाटले होते की पशुसंवर्धन मध्ये मी काय काम करणार परंतु काम सुरू केल्यानंतर या क्षेत्रात काम करण्याला खूप वाव असल्याचे दिसून आले. पशुसंवर्धन विभाग हा सर्व डॉक्टर, पीएचडी झालेल्या उच्चशिक्षित लोकांचा विभाग आहे. या ठिकाणी काम करताना ज्ञानापेक्षा विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविणे, समन्वय आणि अंमलबजावणीची आवश्यकता होती. ते करण्याचे काम आपण केले. आमचे अधिकारी , कर्मचारी चांगल्या पद्धतीने नम्रतेने सर्वांना सेवा देतात. त्यामुळेच पशुसंवर्धन विभागाने देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो सारखा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी करून दाखवला आहे. पशुसंवर्धनातून राज्याच्या आर्थिक गतीला चालना देण्याचे काम होणार आहे. त्या दृष्टीने आपण विभागाच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. येणाऱ्या काळात सरकारचे उपक्रम, योजना यासाठी पशुपालकांच्या अनुभव, मेहनत व ज्ञानाचा निश्चित उपयोग करून अधिकाधिक प्रभावीपणे काम करणार असल्याचे ना पंकजाताई यांनी सांगितले.
म्हणून मी पण डॉक्टर झाले....
यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी काही महत्त्वपूर्ण संदर्भांचा उल्लेख केला.पशुसंवर्धन मंत्री म्हणून काम सुरू केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, या विभागात काम करणारे सर्वच लोक हे उच्चशिक्षित आहेत .कोणी डॉक्टर आहे, कोणी पीएचडी धारक आहे, कोणी वेगवेगळे प्रयोग करणारे संशोधक आहेत, माणसापेक्षा अबोल असणाऱ्या पशुपक्ष्यांशी ज्यांचे घट्ट नाते बनलेले आहे. मुक्या प्राण्यांच्या भावभावना ज्यांना समजतात व अतिशय नम्रपणाने एखाद्या लेकरासारखा सांभाळ ते पशुंचा करतात. असे संवेदनशील लोक या विभागात काम करतात. नुकतीच मला डॉक्टरेट मिळाली. माझ्या विभागातील सर्व डॉक्टरांना शोभावे यासाठीच मी पण आता डॉक्टर आहे असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
25 वर्षानंतर हे मैदान पुन्हा सजले
दरम्यान, यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी ज्या मैदानावर महापशुधन एक्सपो विक्रमी प्रतिसादाने यशस्वी झाला त्या मैदाना बद्दलची आपल्या खाजगी जीवनातील आठवणही सांगितली. त्यांनी सांगितले की, तब्बल 25 वर्षानंतर या मैदानाला अतिशय रचनात्मक पद्धतीने सजविण्यात आले. सजावट, सर्व व्यवस्था, भोजनावळी, पंगती, जिथल्या तिथे सर्व व्यवस्था, अतिशय सुरेखपणाने ही व्यवस्था झाली. 25 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीची व्यवस्था माझ्या विवाहाच्या वेळी मुंडे साहेबांनी केल्याची एक हृदयातली एक भावनिक ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितली.कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, पशुपालक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा